PCMC Pollution: पिंपरी-चिंचवड परिसर प्रदुषणाच्या विळख्यात; महापालिकेकडून अनेक आस्थापनांवर कारवाई

पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात वाढत्या औद्योगिक प्रकल्पांमुळे, आरएमसी प्लांट्स, बांधकाम कामांमधून निर्माण होणाऱ्या धुळकणांमुळे आणि वाहतुकीतील वाढत्या धूर उत्सर्जनामुळे नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात वाढत चाललेले हवा प्रदूषण हा खरोखरच गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. वाढत्या औद्योगिक प्रकल्पांमुळे, आरएमसी प्लांट्स, बांधकाम कामांमधून निर्माण होणाऱ्या धुळकणांमुळे आणि वाहतुकीतील वाढत्या धूर उत्सर्जनामुळे नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत आहे. श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ आणि फुफ्फुसांशी संबंधित समस्या वाढत चालल्या आहेत. प्रशासनाने काही कारवाई सुरू केली असली तरी प्रदूषण नियंत्रणासाठी कडक नियमांची गरज आहे. महापालिकेकडून आता अनेक आस्थापनांवर कारवाईचा धडका सुरू करण्यात आला आहे.

महापालिकेकडून काही आरएमसी प्लांट्सवर कारवाई

काही महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड भागातील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळली आहे. यामुळे महापालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे. प्रदूषणाला रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पही कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ताथवडे, पुनावळे, पिंपळे, निलख आणि मोशी परिसरातील नऊ आरएमसी प्रकल्पांना टाळे ठोकले आहेत. तसेच वायुप्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना न केल्याबद्दल आणखी 30 प्रकल्पांवर कारवाई करण्यात येणार आहे.

प्रकल्पांकडून नियमांचे उल्लंघन; प्रदुषणाचा विळखा

उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडचा विकास झपाट्याने होत आहे. हा विकास होत असतानाही पर्यावरणाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आरएमसी प्रकल्पांसाठी अत्यंत कठोर नियम घालून दिले आहेत, पण अनेक प्रकल्प चालवणारे या नियमांचे उल्लंघन करत आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने वायुप्रदूषणासाठी कारणीभूत ठरणारे आणि नियमांचे पालन न करणाऱ्या शहरातील 30 प्रकल्पांची यादी महापालिकेच्या पर्यावरण विभागाला दिली आहे. शहरातील पर्यावरणविषयक समस्या आणि तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी महापालिकेने दोन तपासणी पथकांची नेमणूक केली आहे.

आरोग्याची काळजी घ्यावी; महापालिकेचे आवाहन

पिंपरी-चिंचवडमधील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. औद्योगिक धूर, आरएमसी प्लांटमधून होणारे उत्सर्जन, सतत सुरू असलेली बांधकामे आणि रस्त्यांवरील वाढती वाहतूक कोंडी यामुळे हवेची गुणवत्ता सतत खालावत आहे. या प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम मुलांवर, ज्येष्ठांवर आणि श्वसनाच्या आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांवर होत आहे. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी आरोग्याची योग्य काळजी घेण्याची गरज निर्माण झालेली आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News