बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएचा दारूण पराभव होईल अशी चर्चा असतााच तब्बल २०२ जागा मिळवत महायुती सत्तेत आली आहे. तर, महाआघाडीला फक्त ३५ जागा मिळवता आल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरेंनी निकालाच्या मुद्द्यावर एनडीएवर टीका केली आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील आक्रमक असं चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
बिहारच्या निकालावर उद्धव ठाकरे म्हणाले…
“आपले मुख्यमंत्री म्हणाले की जो जीता वही सिकंदर, मात्र, सिकंदर बनण्यामागचं राज आजपर्यंत कोणी समजू शकलेलं नाही. बिहारच्या निवडणुकीत जे जिंकले त्यांचं अभिनंदन. मात्र, एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं की तेजस्वी यादव यांच्या सभेला जो मिळणारा प्रचंड प्रतिसाद होता, मग तो प्रतिसाद खरा होता की एआयने तयार केलेली माणसे होते” असा टोला ठाकरेंनी लगावला आहे. “ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते, त्याचं सरकार न येता ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या असतात त्यांचं सरकार येतंय असं म्हणत या नवीन लोकशाहीतील हे गणित कळण्याच्या पलिकडचं आहे,” असंही ते म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंनी बिहारमध्ये महिलांना १० हजार रुपये देण्याच्या योजनेच्या फॅक्टरबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे. “महिलांना पैसे वाटण हा फॅक्टर झाला. याचा कदाचित काहीसा फरक पडलाही असेल. पण तेथील लोक ज्या समस्या भोगत आहेत, ते एवढ्या लवकर बदलतील असं वाटत नाही. पण आता ठिक आहे की, जो जीता वही सिकंदर,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला.
देवेंद्र फडणवीसांचं ठाकरेंना चोख प्रत्युत्तर
“उद्धव ठाकरे मराठवाड्यात आले तेव्हा अंबादास दानवे माणसं शोधत होते. लोकांना माहिती आहे यांच्याकडं काही नाही. आपल्याला प्रत्येक निवडणुकीत प्रचंड विजय मिळवायचा आहे. कार्यकर्त्यांच्या मदतीने भाजप मोठा पक्ष ठरणार आहे, “असं मत यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं आहे. विदर्भ आणि मराठवाडा परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत.











