महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादकांच्या अडचणी चांगल्याचा वाढत आहेत. कारण बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनचे आवक नियमित नसल्याने कधी माल जास्त येतो तर कधी कमी, यामुळे बाजारभावामध्ये कमालीची अस्थिरता सध्या पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी 7 हजारांच्या पार पोहोचलेला दर आता 5 हजारांच्या आत आल्याचे दिसते. परिणामी शेतकऱ्यांमध्ये सध्या कमालीची चिंता पाहायला मिळत आहे. राज्यातील सोयाबीन बाजारात सध्या दरांमध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. नव्या हंगामातील आवक वाढत असताना काही बाजार समित्यांमध्ये दर वाढताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी घसरण नोंदली जात आहे. अशा संपूर्ण परिस्थितीत नागपुरातून मात्र गुड न्यूज समोर आली आहे. कारण, विक्रमी 8 हजारांचा दर सोयाबीनला मिळाल्याची माहिती समोर येत आहे.
नागपुरात सोयाबीनला विक्रमी दर
राज्यातील सोयाबीन बाजारात मागील दोन दिवसांपासून दरांमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. काही बाजार समित्यांमध्ये दर स्थिर राहिले असले, तरी अनेक ठिकाणी आवक वाढणे, दर्जानुसार दर ठरणे आणि स्थानिक मागणीतील फरक यामुळे भावात अस्थिरता दिसून आली. 2 आणि 3डिसेंबर रोजी नागपूरमध्ये सोयाबीनला उच्चांकी दर मिळाला तर लासलगाव, अमरावती, जळगावसह काही बाजारांमध्ये दर तुलनेने कमी राहिले.

आज 3 डिसेंबर रोजी नागपूर बाजारात लोकल सोयाबीनचे दर 8,000 ते 8,200 रुपयांपर्यंत गेले असून सरासरी दर 8,150 रुपये नोंदला गेला. हा दर राज्यातील सर्व बाजारपेठांमध्ये सर्वाधिक आहे. कमी आवक (फक्त 3 क्विंटल) आणि चांगल्या प्रतीचे सोयाबीन मिळाल्याने दरात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे जळगाव-मसावत येथे 3 डिसेंबरला सोयाबीनचा दर 3,950 रुपये इतका राहिला. आवक 34 क्विंटल इतकी होती. तर मुरूम बाजारात पिवळ्या जातीची आवक 49 क्विंटल असून दर 4,212 ते 4,432 रुपयांदरम्यान राहिला. सरासरी भाव 4,337 रुपये नोंदला गेला.
राज्यभरात सोयाबीनच्या दरात सुधारणा
लासलगाव आणि विंचूर बाजारात 2 डिसेंबरला जवळपास 1,500 क्विंटल जवळपास आवक झाली. मात्र दर 3,000 ते 4,530 रुपयांदरम्यान राहिले. सरासरी दर 4,450 रुपयांच्या आसपास स्थिर होता. मोठ्या आवकीमुळे दरात गडगडाट दिसून आला. छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, राहुरी-वांबोरी, मानोरा, सोलापूर, कोपरगाव, अकोला, यवतमाळ, बार्शी-टाकळी, बुलढाणा, औराद शहाजानी, मुखेड, सेनगाव आदी बाजारामध्ये दर साधारण 4,000 ते 4,600 रुपयांच्या श्रेणीत राहिले. काही बाजारांमध्ये दरात जास्तीत जास्त 4,720 रुपये (बाभुळगाव) तर किमान 3,000 रुपये (बाभुळगाव, आष्टी) असे दर नोंदले गेले.
लातूरमध्ये 7,211 क्विंटल अशी मोठ्या प्रमाणात आवक झाली. दर 3,850 ते 4,620 रुपये तर सरासरी 4,400 रुपये नोंदला गेला. या भागात स्थानिक चिंधी बाजार, तेल गिरण्यांची मागणी आणि चांगल्या प्रतीच्या सोयाबीनमुळे दर समाधानकारक आहेत. जालनामध्ये 7,355 क्विंटल आवक असून दर 3,800 ते 5,300 रुपये इतका मोठा फरक दिसून आला. सरासरी दर 4,425 रुपये राहिला.











