शहरातील वाढत्या वायू प्रदूषणाची समस्या ही आजच्या काळातील अत्यंत गंभीर समस्या आहे. औद्योगिक वाढ, वाहनांची संख्या वाढणे, बांधकामे, धूलीकण, धूर आणि इंधनाचा जास्त वापर यामुळे शहरी भागातील वायू गुणवत्ता झपाट्याने खालावत आहे. अशा परिस्थितीत थंडीच्या दिवसांमध्ये शहरांतील हवेची गुणवत्ता अधिकच ढासळत असते. अशा परिस्थितीत पुण्यातील हवेच्या गुणवत्तेबाबत धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे.
पुण्यातील हवेची गुणवत्ता ढासळली !
महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र असलेले पुणे आता त्याच्या खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे गंभीर चिंतेचा विषय बनले आहे. शहराची सतत वाढती लोकसंख्या, दरवर्षी लाखो नवीन वाहनांची भर आणि गंभीर वाहतूक कोंडी यामुळे पुण्याचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ‘गंभीर’ श्रेणीत धोकादायक 242 वर पोहोचला आहे. शहरातील चार प्रमुख भागांमधील हवेची गुणवत्ता इतकी खालावली आहे की नागरिकांना श्वास घेणेही कठीण झाले आहे. डिसेंबरच्या सुरुवातीपासून पुण्यातील प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत आहे. जिथे सकाळी आणि संध्याकाळी धुके दिसायला हवे होते, तिथे धूर आणि धूळ यांचे प्रदूषणकारी धुके दिसून येते. गुरुवारी प्रदूषणाने हंगामातील सर्वोच्च पातळी गाठली. त्यामुळे एकूणच परिस्थिती बिकट बनली आहे.

वायू प्रदूषण वाढले, आरोग्य जपा
वायू प्रदूषण वाढल्यामुळे आरोग्यावर होणारा परिणाम गंभीर ठरू शकतो. वाढलेला PM2.5 व PM10, धूर, धूळकण आणि औद्योगिक उत्सर्जनामुळे श्वसनाचे आजार, घशात खवखव, डोळ्यांची जळजळ, दम्याचे त्रास तसेच हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. नागरिकांनी अशा परिस्थितीत मास्कचा वापर, पाणी पुरेसे पिणे, घरात एअर प्युरिफायरचा वापर, सकाळ-संध्याकाळ अनावश्यक बाहेर जाणे टाळणे आणि वाहनांचा अनावश्यक वापर कमी करणे आवश्यक आहे. प्रशासनाने प्रदूषण नियंत्रणासाठी तातडीची उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.











