माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं आहे. लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसापासून ते आजारी होते. शिवराज पाटील चाकूरकर आयुष्यभर काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय राहिले. मागील अनेक वर्षांपासून राजकीय जीवनातून निवृत्त होते. राजकारणातील अत्यंत अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेले राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पाच दशकांहून अधिक काळ संसदीय व प्रशासकीय क्षेत्रात भक्कम उपस्थिती राखलेल्या पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री आणि राज्यपाल अशा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये उल्लेखनीय कार्य केले. अभ्यासू, शांत आणि नैतिक नेतृत्वाची ओळख असलेल्या या ज्येष्ठ नेत्याच्या जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शिवराज पाटील चाकूरकरांबद्दल थोडक्यात…
शिवराज पाटील यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९३५ रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर गावात झाला. ते लातूरसह मराठवाड्यातील काँग्रेसचे प्रभावी नेते होते. त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून सात वेळा विजय मिळवला होता. २००४ मध्ये लोकसभेतून पराभूत झाल्यानंतरही राज्यसभेतून गृहमंत्रिपद आणि केंद्रीय जबाबदाऱ्या स्वीकारल्या होत्या. २००४ ते २००८ या काळात त्यांनी केंद्रात गृहमंत्रिपद भूषवले. शिवराज पाटील चाकूरकर हे लोकसभा अध्यक्षपदासह विविध केंद्रीय मंत्रीपदांवर कार्यरत होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत देशासाठी अनेक प्रतिष्ठित पदे भूषवली आहे. देशातील संवैधानिक प्रक्रियेत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती.












