दिवाळीचा पाच दिवसांचा सण भाऊबीज झाली की संपतो. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणाऱ्या या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी बहिण भावाला औक्षण करते, भाऊ-बहीण एकमेकांना भेटून प्रेम, स्नेह आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतात. भाऊबीजेला बहिणीने भावाला कशा रितीने औक्षण करावे व त्यासाठी काय तयारी करावी ते जाणून घेऊया….
‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
- भाऊबीजेला बहिणीने भावाचेऔक्षण करण्यासाठी पुजेचे ताट तयार करावे. त्यात कुंकू, हळद, अक्षता, नाण, सोनं, सुपारी, नारळ, दिवा, मिठाई ठेवावी.
- भावाला औक्षणापुर्वी चौरंगावर किंवा पाटावर पुर्व पश्चिम बसवावे. या चौरंग किंवा पाटावर लाल आसन टाकावे त्यावर तांदळाची आरासही काढू शकता.
- भावाला चौरंगावर बसवून बहिणीने सर्वप्रथम भावाच्या कपाळी लाल कुंकवाचा टिळा लावावा.
- कपाळी टिळा लावल्यानंतर डोक्यावर अक्षता टाकाव्या.
- औक्षणानंतर, भाऊ-बहिणींनी एकमेकांना भेटवस्तू द्याव्यात आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा द्याव्यात.
भाऊबीजेचे महत्त्व
हा सण भाऊ-बहिणीच्या नात्याला दृढ करतो. या दिवशी बहिणी भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करतात. भाऊबीजला यम द्वितीय असेही म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी यमराज त्यांची बहीण यमुनेच्या घरी गेले होते. यमुनेने त्यांचे भोजन करून स्वागत केले आणि तिलक लावला. यावर प्रसन्न होऊन यमराज म्हणाले की, या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीकडून तिलक लावेल त्याला दीर्घायुष्य आणि सुख आणि समृद्धी मिळेल. तेव्हापासून, भावा-बहिणीचे नाते दृढ करण्यासाठी दरवर्षी हा सण साजरा केला जातो.
