Diwali Padwa 2025 : पाडव्याच्या दिवशी पतीचे औक्षण का केले जाते? जाणून घ्या पौराणिक कथा

दिवाळी हा सण आनंदाचा, उत्साहाचा आणि दिव्यांचा सण. या दिवसात आपल्या सर्वत्र रोशनाई पाहायला मिळते. तसेच फटाके, रांगोळी आणि दिव्यांची आरास म्हणून हा सण ओळखला जातो.

हिंदू धर्मात दिवाळी किंवा दीपावली या सणाला सण-उत्सवाचा राजा मानले जाते. प्रत्येकाला दिवाळी या सणाची उत्सुकता असते. दिवाळी सण आनंदाचा, उत्साहाचा आणि घरोघरी प्रकाशाचे दिवे उजळून अंधाराला दूर करण्याचा सण आहे. हिंदू धर्मात दिवाळी सणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळीला ‘दिपावली’ असेही म्हणतात. असे सांगितले जाते की, या दिवशी भगवान राम चौदा वर्षांचा वनवास भोगून अयोध्येत परतले होते. त्यामुळे हा आनंदा साजरा करण्यासाठी सर्वत्र दिवाळी साजरी करण्यात आली. दरवर्षी दिवाळीची सर्वचजण आतुरतेने वाट पाहतात. दिवाळी पाच दिवसांची असते. लक्ष्मी पूजनानंतरचा दुसरा दिवस हा दिवाळी पाडवा म्हणून साजरा होतो. दिवाळी पाडव्याला पत्नीने पतीस अभ्यंगस्नान घालावं आणि औक्षण केलं जातं. त्यांना उदंड आयुष्य लाभावं यासाठी देवाकडे प्रार्थना करते. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. नवरा आपल्या घरातील लक्ष्मीला आजच्या दिवशी भेटवस्तू देतो….

पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीचं औक्षण का करते? 

सत्यवान सावित्रीची कथा सर्वांना माहितीच आहे. या दिवशी महासती पातिव्रत्य धर्माचं स्मरण म्हणून दिवाळी पाडवा साजरा करण्यात येतो. पौराणिक कथेनुसार, असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू होता. राक्षस कुळामध्ये जन्म घेऊन देखील चारित्र्यवान, विनयशील, प्रजेच्या हितासाठी दक्ष राजा म्हणून बळी राजा ओळखला जात होता. राजा बलीने आपल्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केल्याचं म्हटलं जातं. बळी राजा हा अतिशय दानशूर होता. परंतु त्याला अहंकाराचा वारा लागल्याने तो अहंकारापासून दूर राहू शकला नाही. अहंकारामुळे माणसाची अधोगती होते. तसंच राजाचं सुद्धा तेच झाले आणि त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंनी वामनावतार म्हणून बटूचं रूप घेतलं आणि तो बळी राजाकडे दान मागायला गेला.

यावेळी बळी राजाने एक यज्ञ केला आणि या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. ते दान घेण्याच्या निमित्ताने भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला. बटू वेशात ते बळी राजासमोर उभे राहिले आणि त्यांनी तीन पावलं जमीन मागितली. यावेळी वचनाला जागून बळी राजाने हे दान देण्याची तयारी दाखविली, तेव्हा वामनावतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी लोक व्यापलं. तिसरं पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळी राजाने आपलं डोके पुढे केलं. तीन पावलांमध्ये भगवान विष्णूंनी बळी राजाकडून सर्व काही काढून घेतलं. यावेळी बळी राजाच्या मनाचा उदारपणा बघून भगवान श्रीहरी विष्णू बळी राजावर प्रसन्न झालं आणि त्याला त्यांनी पाताळाचं राज्य देऊ केलं.

या संपूर्ण प्रसंगामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची लीला पाहून अर्थात आपल्या पतीची लीला आणि औदार्य पाहून लक्ष्मी प्रसन्न झाली. यावेळी तिने भगवान श्रीहरी विष्णूंना ओवाळलं. भगवान श्रीहरी विष्णूंनीसुद्धा माता लक्ष्मीला ओवाळणी दिली आणि त्या दिवसापासून पत्नी पतीचं औक्षण करतं. तेव्हापासून या दिवस पाडवा साजरा केला जातो.

यंदा दिवाळी पाडवा कधी?

22 ऑक्टोबर 2025 ला बालिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा साजरा केला जाणार आहे. नवविवाहित वधु-वरांसाठी हा दिवस फार खास असतो. दिवाळी पाडव्याला पती आपल्या पत्नीला खास अशी भेट वस्तू देतो. तसेच, पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते. पाडव्याच्या सणापासून अनेक नव्या कामांना सुरुवात करण्यात येते. यासाठी पाडवा हा सण अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News