लक्ष्मीपूजनानंतर लगेच साजरा होणारा महत्त्वाचा सण म्हणजे बलिप्रतिपदा, ज्याला दिवाळी पाडवा म्हणूनही ओळखले जाते. हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे त्याला अतिशय शुभ मानले जाते. हा केवळ आनंद आणि उत्साहाचा उत्सव नसून, त्यामागे अनेक पौराणिक आख्यायिका आहेत.
पौराणिक कथा
पौराणिक कथांनुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, प्रजेचे हित पाहणारा राजा म्हणून बळीराजाची ओळख होती. दानशूर म्हणूनही या राजाची ख्याती होती. पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या जोरावर देवांचाही पराभव केला. बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटूवेशात समोर उभे राहिले. या रूपात वामनाने तीन पावले भूमी मागितली.

वचन दिल्या कारणाने बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखवली तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवत वामनाने त्याला पाताळ लोकचे राज्य बहाल केले. बळीराजा गर्विष्ठ झाला तरीही दानशूरपण अंगी असल्याने त्याला पाताळ लोकचे राज्य देण्यात आले आणि त्याला वरदान दिले की, कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’ अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी तसंच दीपोत्सवही साजरा केला जातो.
बलिप्रदतेचे महत्व
कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. सोने खरेदीस प्राधान्य, सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ असे या दिवसाचे महत्त्व आहे. फटाक्यांची आतषबाजी, तसेच दीपोत्सवही केला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असून अतिशय शुभ मानला जातो.पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते.











