MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

Ganesh Chaturthi 2025 : भगवान गणेशाला तुळस का वाहिली जात नाही? रंजक आहे त्यामागील कहाणी

Written by:Smita Gangurde
एक गोष्ट बाप्पाला कधीच अर्पण केली जात नाही. ती आहे तुळस. यामागे एक पौराणिक कथा आहे.

Why is Tulsi not offered to Ganesha : दरवर्षी गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाची सुरुवात होईल. या पर्वात बाप्पााला मोदक, दुर्वा आणि विविध प्रकारचे पक्वान्न अर्पण केले जातात. मात्र एक गोष्ट बाप्पाला कधीच अर्पण केली जात नाही. ती आहे तुळस. यामागे एक पौराणिक कथा आहे.

गणेशाने तुळशीला का दिला होता शाप?

धर्मशास्त्रांनुसार, एकेदिवशी तुळस तीर्थ यात्रेवर गेली होती. गंगेच्या किनाऱ्यावर तिने भगवान गणेशाला तपस्या करताना पाहीलं. गणेश रत्नजडित सिंहासनावर विराजमान होते. त्यांच्या शरीरावर चंदन लावलं होतं आणि त्यांनी विविध प्रकारचे दागिने परिधान केले होत. गणेशाचं हे रुप पाहून तुळस आकर्षित झाली. तिच्या मनात गणेशासोबत विवाह करण्याची इच्छा निर्माण झाली.

तुळशीची मागणी गणेशाने फेटाळली

तुळशीने गणेशाला लग्नाची मागणी केली. मात्र गणेशाने तो ब्रम्हचारी असल्याचं सांगून तिची मागणी फेटाळून लावली. त्यावेळी तुळशीला राह आला आणि तिने गणेशाला शाप दिला. तुझे दोन लग्न होतील असं तुळस यावेळी गणेशाला म्हणाली. यानंतर गणेशालाही राग आला. असूर शंखचूडशी तुझं लग्न होईल असा शाप गणेशाने तुळशीला दिला. मात्र यानंतर गणपती शांत झाला आणि तू भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाची प्रिय असेल असं म्हणत वातावरण शांत केलं. परंतु माझ्या पूजेमध्ये तुळशीचा वापर कधीही केला जाणार नाही, असंही गणेश यावेळी म्हणाला. तेव्हापासून, असे मानले जाते की भगवान गणेशाच्या पूजेमध्ये कधीही तुळशीची पाने अर्पण केली जात नाहीत.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)