धक्कादायक! मुंबईतील काळाचौकी परिसरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; पाच अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

अल्पवयीन मुलीवर पाच जणांना मिळून सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील काळाचौकी परिसरात ही घटना घडली.

मुंबई शहर आणि उपनगरांतील अल्पवयीन मुली आणि तरूणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि भारतातील सुरक्षित शहरांपैकी एक अशी ओळख असलेल्या मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका अल्पवयीन मुलीवर पाच जणांना मिळून सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील काळाचौकी परिसरात ही घटना घडली. या मुलीचे अश्लील व्हिडीओ चित्रीत करण्यात आले होते. हे व्हिडीओ दाखवून या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करण्यात आले.

ब्लॅकमेलिंग करत मुलीवर अत्याचार

या ब्लॅकमेलिंगला बळी पडल्यामुळे पाच जणांनी या मुलीवर सामूहिक अत्याचार केले. धक्कादायक गोष्ट म्हणजे अत्याचार करणारी पाचही मुले ही अल्पवयीन आहेत. या घटनेमुळे काळाचौकी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काळाचौकी पोलिसांनी मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या पाचही जणांना ताब्यात घेतले आहे. या सगळ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या मुलीवर अत्याचार सुरु होते. सततच्या या अत्याचाराला कंटाळून अखेर मुलीने तिच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीना ताब्यात घेतले. ही पाच मुलं कोण आहेत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ही घटना उघडकीस आल्यानंतर काळाचौकी परिसरात संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे आता पोलीस याप्रकरणात काय कारवाई करतात, हे बघावे लागेल.

महिला, मुलींची सुरक्षितता धोक्यात?

अलीकडच्या काळात महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता निर्माण झाल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी, प्रवासादरम्यान तसेच ऑनलाइन माध्यमांवर छेडछाड, पाठलाग, अपमानजनक वर्तनाच्या घटना वाढताना दिसतात. अनेकदा अत्याचार देखील होतात. अशा घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण तयार होते आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा येतात. प्रशासनाने कठोर कायदे, जलदगती न्याय आणि पोलिसांची सतर्कता वाढवणे आवश्यक आहे. समाजानेही मुलींविषयी आदर, संवेदनशीलता आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखणे, महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे आणि जनजागृती करणे हे अत्यावश्यक आहे, जेणेकरून महिला आणि मुली निःशंकपणे जगू शकतील.


About Author

Rohit Shinde

Other Latest News