Marathi News

मुंबईत तस्करीचे सोने वितळवणारा कारखाना उध्वस्त; DRI च्या कारवाईत 11 जण अटकेत

Written by:Rohit Shinde
Published:
तस्करीद्वारे देशात येणारं सोनं मुंबईतील एका घरात वितळवण्याचं काम सुरू असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये डीआरआयने कारवाई करत 11 जणांना अटक केली आहे.
मुंबईत तस्करीचे सोने वितळवणारा कारखाना उध्वस्त; DRI च्या कारवाईत 11 जण अटकेत

मुंबईतील वाढती सोने तस्करी हा कायदा व सुव्यवस्थेसाठी गंभीर प्रश्न बनला आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर सोने परदेशातून तस्करी करून आणले जाते आणि विविध मार्गांनी वितळवून विक्री केली जाते. या गैरव्यवहारामुळे सरकारी महसूल घटतो आणि गुन्हेगारी नेटवर्क अधिक बळकट होते. महसूल गुप्तचर संचालनालय आणि पोलिस विभाग सतत कारवाई करत असले तरी या तस्करीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. अशीच एक सोने तस्करीची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सोने वितळवण्याचा कारखाना उध्वस्त

तस्करीद्वारे देशात येणारं सोनं मुंबईतील एका घरात वितवण्याचं काम सुरू असल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील एका घरात या तस्करीच्या सोन्यापासून सोन्याच्या विटा आणि पावडर तयार केली जात होती. केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी हा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. चार ठिकाणी छापेमारी करीत ११ जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय १५ कोटींचं सोनं जप्त करण्यात आलं आहे.

याशिवाय अधिकाऱ्यांनी सोनं वितवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भट्ट्या त्याशिवाय बार किंवा विटा तयार करण्यासाठीचं साहित्य जप्त केलं आहे. याशिवाय आणखी कुठे कुठे असे कारखाने सुरू आहेत, याचाही शोध घेतला जात आहे. गेल्या काही वर्षात सोन्याच्या तस्करीचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. परिणामी विमानतळावरही मोठ्या संख्येने सोन्याची तस्करी केली जाते.

सोने तस्करीमुळे महसूलावर परिणाम

सोने तस्करीमुळे देशाच्या महसुलावर मोठा परिणाम होतो. अधिकृत मार्गाने सोने आयात केल्यास सरकारला कस्टम ड्युटी आणि कराच्या रूपाने मोठा महसूल मिळतो, परंतु तस्करीद्वारे हे सोने देशात येत असल्याने त्या कराची टाळाटाळ होते. परिणामी सरकारच्या खजिन्यातील महसूल घटतो आणि अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. शिवाय, काळा पैसा वाढण्यास आणि गुन्हेगारी नेटवर्क मजबूत होण्यासही ही तस्करी कारणीभूत ठरते. त्यामुळे सोने तस्करीवर नियंत्रण ठेवणे हे देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews