बॉलिवूडच्या लोकप्रिय कोरिओग्राफर, दिग्दर्शिका आणि निर्माती फराह खानने (Farah khan) अलीकडेच अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्या सोबत ‘टू मच शो’ या चर्चासत्रात हजेरी लावली. या वेळी तिने तिच्या आयुष्यातील काही आठवणी, करिअरमधील किस्से आणि फिल्म इंडस्ट्रीतील अनुभव मोकळेपणाने शेअर केले. विशेष म्हणजे, तिने एका प्रसंगाचा उल्लेख करताना सांगितले की शूटिंगदरम्यान एकदा एका दिग्दर्शकाने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता.
काय म्हणाल्या फराह खान – Farah khan
फराह म्हणाली, “ट्विंकल, तुला माहित आहे का मी त्या काळी किती हॉट होते! एकदा एक दिग्दर्शक होता, जो शूटिंगदरम्यान माझ्यावर डोरे टाकत होता. एकदा तो माझ्या खोलीत आला, म्हणाला की एका गाण्याबद्दल बोलायचं आहे. मी बेडवर बसले होते, तो सरळ माझ्या शेजारी येऊन बसला. त्या क्षणी मला इतकं वाईट वाटलं की मी त्याला लाथ मारून बाहेर हाकललं.” तिच्या या वक्तव्यावर ट्विंकल खन्ना जोरात हसली आणि म्हणाली, “होय, मी त्या घटनेची साक्षी आहे! तो काही केल्या तिच्या मागे लागलेलाच होता, पण फराहने त्याला योग्य धडा शिकवला.”

लोक सेटवर अफेअर का करतात ?
या चर्चेदरम्यान फराह खानने (Farah khan) तिच्या अभिनय कारकिर्दीबद्दलही मनमोकळेपणे बोलली. तिने सांगितले, “मला आजही कळत नाही मी अभिनय का केला. बहुतेक मला वेळ होता आणि बोमन इराणीने मला फोन केला. त्याचबरोबर संजय लीला भन्साळी माझ्या घरी आले आणि म्हणाले, ‘मी रोज सेटवर असणार.’ बोमनसोबत काम करण्याचा अनुभव छान होता, पण मला अभिनयाचा कंटाळा आला. तिथे फक्त बसून वाट पाहायची वेळ येते. त्या वेळी मला समजलं की लोक सेटवर अफेअर का करतात कारण त्यांना कंटाळा येतो!”
यानंतर फराह खानने तिच्या दिग्दर्शक कारकिर्दीतील महत्त्वाच्या चित्रपटांबद्दल बोलताना ‘तीस मार खान’ या चित्रपटाचा उल्लेख केला. ती म्हणाली, “‘तीस मार खान’ने १५ वर्षांपूर्वी तब्बल ६५ कोटींची कमाई केली होती. आजच्या जनरेशनसाठी ती एक कल्ट फिल्म झाली आहे. जेव्हा कोणी विचारतं की, कोणत्या चित्रपटाचा सिक्वेल करशील, तेव्हा सगळ्यांचा पहिला पर्याय ‘तीस मार खान’ असतो.” ट्विंकल खन्नानेही या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची शक्यता विचारली. तेव्हा अनन्या पांडे मध्येच म्हणाली, “मी यात काम करू का?” यावर फराहने मिश्कील उत्तर दिलं, “हो, तू कटरीनाची लहान बहिण बनू शकतेस.”
फिल्म इंडस्ट्रीतील चढ-उतारांबद्दल बोलताना फराह खानने तिच्या सर्जनशील बाजूबद्दलही सांगितले. ती म्हणाली, “जेव्हा माझ्या फिल्म्स बनणं थांबलं, तेव्हा मी ठरवलं की यूट्यूबवर काम करावं. मला वाटलं, काहीतरी वेगळं करताना थोडी कमाईही होईल. माझी तीन मुलं पुढच्या वर्षी विद्यापीठात जाणार आहेत, आणि शिक्षणाचा खर्च प्रचंड आहे.”चर्चेच्या शेवटी फराहने जीवनाविषयीचा तिचा दृष्टिकोन शेअर केला. ती म्हणाली, “आपलं आयुष्य कोणाच्या भोवती फिरू नये. खरी आनंदी भावना तुमच्या आतून आणि तुमच्या कामातूनच यायला हवी. जर तुम्ही स्वतःच्या आयुष्यात समाधानी असाल, तर जगात काहीही साध्य करू शकता.” फराह खानच्या या प्रामाणिक आणि विनोदी स्वभावामुळे कार्यक्रमाचं वातावरण रंगतदार झालं. तिच्या या कबुलीजबाबांमुळे प्रेक्षकांनाही तिच्या जीवनातील अनोख्या अनुभवांची झलक मिळाली.