महाराष्ट्रासह अनेक राज्यांत वाढती गुन्हेगारी ही नक्कीच चिंतेचा विषय ठरत आहे. चोरी, दरोडे, खून, बलात्कार, अमली पदार्थांची तस्करी, आर्थिक गुन्हे आणि राजकीय वैमनस्यातून होणारे हल्ले या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. पोलिस यंत्रणेवर ताण वाढत असून गुन्हेगार अधिक संघटित व धाडसी होताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत अमरावती शहरातून एक धक्कादायक अशा स्वरूपाची घटना समोर आली आहे.
11 सशस्त्र गुंडांना एटीएसकडून अटक
अमरावतीच्या परतवाडा भागात एका राजकीय कार्यकर्त्याच्या घरातून 11 सशस्त्र गुंडाना अटक केल्याची माहिती समोर आलीयं. या घटनेमुळे अमरावती शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून एटीएस आणि ग्रामीण पोलिसांनी काल रात्री ही कारवाई केलीयं. यासंदर्भात अद्याप पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नसून एका राजकीय कार्यकर्त्याच्या घरातून एकूण 11 जणांना शस्त्रासह अटक करण्यात आल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण
एटीएस आणि ग्रामीण पोलिसांनी दोन ठिकाणांहून या सशस्त्र गुंडांना अटक केली असून अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यातील ब्राम्हण सभा कॉलनीतून 5 जणांना अटक केलीयं तर कश्यप पेट्रोल पंपाजवळ 6 जणांना शस्त्रासह पकडण्यात एटीएस आणि ग्रामीण पोलिसांना यश आलंय. या घटनेमुळे सध्या एकच खळबळ उडाली. अटक करण्यात आलेल्या गुंडांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हे गुंड राजकीय कार्यकर्त्याच्या घरात भाड्याने राहत असल्याचंही बोललं जात आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील ब्राम्हण सभा कॉलनीतून पाच जणांना अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.
अमरावतीमधील एका राजकीय कार्यकर्त्याच्या घरात मागील अनेक दिवसांपासून हे गुंड राहत होते. या गुंडांबाबत अद्याप पोलिसांनी माहिती दिली नाही, मात्र, हे गुंड आंतरराज्यीय टोळी असल्याचं सांगितलं जात आहे. या टोळीचा संबंध हरियाणा राज्यात असल्याचीही चर्चा आहे.











