केंद्र सरकारचे पथक पुरग्रस्त भागांना भेट देण्यासाठी दाखल; लवकरच अहवाल समोर येणार

Rohit Shinde

अतिवृष्टीमुळे सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. सलग पडणाऱ्या पावसामुळे शेतजमिनी पाण्याखाली गेल्या असून पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ऊस, तूर, सोयाबीन, भात, कांदा आणि भाजीपाला पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. काही ठिकाणी जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत केंद्राच्या पथकाने सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये पाहणी केली.

सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यात पथकाची पाहणी

केंद्र सरकारचे पथक पूरग्रस्त भागांना भेट देण्यासाठी सोलापूरमध्ये दाखल झाले, त्यांनी पूरग्रस्त भागांना भेट दिली आणि नुकसानीचा आढावा घेतला. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे चार सदस्यीय पथक सोलापूरमध्ये दाखल झाले. सोलापूर पाठोपाठ हिल्यानगर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, घरे, रस्ते, पूल, वीज व पाणीपुरवठा तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने आज दि. 5 नोव्हेंबर रोजी पाथर्डी तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.

पथकाकडून थेट बांधावर जात स्थितीचा आढावा

पथकाने पाथर्डी तालुक्यातील करंजी, देवराई, पारेवाडी व सोमठाणे खुर्द या गावांना भेट दिली. करंजी येथे राष्ट्रीय महामार्गावरील नुकसानग्रस्त पुलाची पाहणी करण्यात आली. यावेळी पावसाचे पाणी घरात शिरल्याने नुकसान झालेल्या ग्रामस्थ राजेंद्र पारेकर यांच्याशी पथकाने संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली. संत्रा फळबागेची व पावसामुळे खरडून गेलेल्या जमिनीची पाहणी केली. यावेळी पथकाने भविष्यात अशा आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यानंतर पथकाने देवराई येथील बंधारे व पारेवाडी येथील पाण्यामुळे क्षतिग्रस्त झालेल्या पुलाचीही पाहणी केली. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पुलांची व बंधाऱ्यांची सविस्तर माहिती घेत पथकाने आवश्यक त्या ठिकाणी पुनर्बांधणी करण्याच्या सूचना दिल्या.

शेतातील तूर व बाजरी पिकांचे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहून पथकाने संबंधित अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना दिलेल्या तातडीच्या मदतीची माहितीही जाणून घेतली. केंद्रीय पथकाने संपूर्ण पाहणीदरम्यान ग्रामस्थांशी संवाद साधत नुकसानग्रस्तांना दिलासा देत त्यांच्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.

ताज्या बातम्या