MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

सरकारच्या उदासीनतेमुळं जलजीवन मिशन योजनेतील कंत्राटदारानं आयुष्य संपवलं, जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
आज थकलेली बिले घेण्यासाठी राज्यातील कंत्राटदार सरकारच्या दारात याचना व आंदोलने करत आहेत. ही एका खात्याची परिस्थिती नसून, सर्वच खात्यांची परिस्थिती आहे, असंही जयंत पाटीलांनी आरोप केला आहे.
सरकारच्या उदासीनतेमुळं जलजीवन मिशन योजनेतील कंत्राटदारानं आयुष्य संपवलं, जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

Jayant Patil – स्वतःच्या कष्टाच्या जोरावर आपलं विश्व निर्माण करु पाहणाऱ्या युवकांच्या स्वप्नांवर सरकारने पाणी फेरले आहे. १ कोटी ४० लाखांची थकबाकी! जलजीवन मिशन योजनेतल्या कंत्राटदारानं आयुष्य संपवलं, अशी टिका जयंत पाटील यांनी सरकारवर केली आहे. वाळवा तालुक्यातील तरुण, होतकरू हर्षल पाटील या अभियंता कंत्राटदाराने जलजीवन मिशनच्या केलेल्या कामाचे शासनाकडून पैसे मिळत नसल्याने, सरकारच्या त्रासाला व भ्रष्टाचाराला कंटाळून आत्महत्या केली आहे.

कंत्राटदारावर अनेक कामगारांची कुटुंबे अवलंबून…

दरम्यान, ही अत्यंत दुःखद घटना असून हर्षल यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्याच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंतराव पाटील यांनी दिली आहे. एका कंत्राटदारावर केवळ एक घर चालत नसून त्याच्यावर अनेक कामगारांची कुटुंबे सुद्धा अवलंबून असतात, याचे सरकारला कसलेही भान राहिलेले नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रमाणे कंत्राटदारांच्या आत्महत्यांची मालिका सुरु होईल अशी मला भीती वाटते. असं पाटील म्हणाले.

पैसे नसताना विविध कंत्राटांचे वाटप…

पुढे ते म्हणाले की, सरकारच्या रोजगार देण्याच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोरं कंत्राटदारीकडे वळली. स्वतःच्या कष्टाच्या जोरावर आपलं विश्व निर्माण करु पाहणाऱ्या युवकांच्या स्वप्नांवर सरकारने पाणी फेरले, असा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच राज्य शासनाने निवडणुका जिंकण्यासाठी तिजोरीत पैसे नसतांना विविध कंत्राटांचे वाटप केले. अशी भीती व्यक्त करत असताना या परिस्थितीवर सरकारने तात्काळ तोडगा काढावा असे आवाहन त्यांनी सरकारला केले आहे.