‘शिवरायांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका, देश आणि जगाच्या पातळीवर शिवराय आदर्शवत’, रायगडावर अमित शाहा काय म्हणाले?

Smita Gangurde

किल्ले रायगड – महाराष्ट्रातल्या नागरिकांना हात जोडून विनंती आहे की, शिवरायांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका, शिवरायांकडून देश आणि जग प्रेरणा घेवू शकतं. असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी किल्ले रायगडावर केलंय. अमित शाहा यांच्या उपस्थितीत रायगडावर शिवरायांचा 345 वा पुण्यतिथीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी भाषणात छत्रपती शिवरायांच्या कार्याचा गौरवपर भाषण केलं.

स्वधर्माचा अभिमान, स्वराज्याची आकांक्षा आणि स्वभाषेला अमर करणे हे विचार देशाच्या सीमेपुरते मर्यादित राहू शकत नाहीत. मानव जीवनाच्या स्वाभिमानाशी हे विचार जोडले आहेत. आक्रमक शिरजोर असलेल्या काळात, गुलामगिरीची मानसिकता तोडून ही तीन मूल्य शिवरायांनी मूल्य जनतेला दिली.

ही तिन्ही मूल्य घेऊन नरेंद्र मोदी यांचं सरकार कार्य करत असल्याचंही शाहा म्हणालेत. महाराष्ट्र सरकारही शिवारायांना घराघरात पोहचवण्यासाठी कार्यरत असल्याचं ते म्हणालेत.

मुलांनी आणि तरुणांनी रायगडावर यावं -शाहा

राज्यातील सातवी ते बारावीतील विद्यार्थअयांनी रायगड पाहायला हवा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचंही अमित शाहा म्हणालेत. देशातील प्रत्येक तरुणानं रायगडावर येऊन शिवरायांपासून प्रेरणा घ्यावी, असंही शाहा म्हणालेत.

राजकारण करण्यासाठी आलेलो नाही- शाहा

आपण या ठिकाणी कसलंही राजकारण करण्यासाठी आलेलो नाही, शिवरायांच्या पायाशी नतमस्तक करण्यासाठी आलेलो आहोत, असंही अमित शाहा म्हणाले. शिवरायांच्या स्मृतीतून अनुभूती घेण्यासाठी आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. शिवरायांची राजमुद्रा ही हिंदवी स्वराज्याची संवाहक ठरलेली आहे. असंही शाहा म्हणाले.

ताज्या बातम्या