उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात गारठा वाढला; साधारण तापमानात 4 ते 8 अंशांची घसरण

Rohit Shinde

उत्तरेकडून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका प्रचंड वाढला असून अनेक जिल्ह्यांत कोल्ड वेव्हची स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईसह उपनगरात गारठा जाणवत असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासाठी हवामान विभागाने ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. काही भागांत तापमान 4 ते 8 अंशांपर्यंत खाली गेल्याने नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर वाढवला असून शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा

महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, तसेच शेजारील पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये थंडीचा तीव्र परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. कडाक्याच्या थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रात तापमान 5 अंशांपर्यंत पोहोचलं आहे. तर विदर्भात 7-8 अंशांवर तापमान आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये शीत लहरीची स्थिती कायम राहील. याचा अर्थ राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान लक्षणीयरीत्या खाली घसरण्याची शक्यता आहे.

राज्यात थंडीची स्थिती असताना, आगामी दिवसांमध्ये तापमानात काही चढ-उतार पाहायला मिळतील. पुढचे 48 तास महाराष्ट्रातील किमान तापमानात कोणताही मोठा बदल अपेक्षित नाही, म्हणजेच थंडीचा कडाका कायम राहील. त्यानंतर पुढील तीन दिवसांसाठी किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना थंडीपासून थोडा दिलासा मिळेल. त्यामुळे एकूणच मुंबईसह महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा येथे ऑरेंज अलर्ट, जळगाव, नाशिक, नागपूरसह जिल्ह्यांना यलो अलर्ट, थंडीचा कडाका कायम.

महाराष्ट्रात थंडीत वाढ; आरोग्य जपा !

दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात तापमानाचा पारा आणखी खाली येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. कडाक्याच्या थंडीत आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. थंड तापमानामुळे सर्दी, खोकला, ताप आणि सांधेदुखी यांसारख्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे शरीर उबदार राहील अशी कपडे घालणे, गरम पाणी पिणे आणि पौष्टिक आहार घेणे महत्त्वाचे आहे.

सकाळी कोमट पाण्याने अंघोळ करणे, वाफ घेणे आणि घरात पुरेशी हवेशीर व्यवस्था ठेवणे फायदेशीर ठरते. वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि अस्थमा किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी अतिरिक्त काळजी घ्यावी. व्यायाम करताना शरीरावर थंडीचा परिणाम होऊ नये म्हणून योग्य कपडे वापरावेत. पुरेसे पाणी पिणे आणि विश्रांती घेणेही आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

थंडीत हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. कारण, तापमान घटल्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तदाब वाढतो. अशा परिस्थितीत हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढणे किंवा आधीपासून हृदयाचे विकार असलेल्या व्यक्तींनी खास काळजी घेणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्या