पुण्यातील कार अपघात प्रकरणात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील पोलिसांनी क्लिन चीट दिली असली तरी सध्या हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकारानंतर गौतमी पाटीलवर अनेक आरोप करण्यात आले. अखेर या सगळ्या प्रकरणावर गौतमीने मौन सोडले असून अपघातावेळी गाडीमध्ये मी नव्हते, मला उगाच बदनाम केलं जातंय असे म्हणत गौतमीला अश्रू अनावर झाले.
माझी नाहक बदनामी – गौतमी पाटील
पुण्यातील नवले पुलजवळ झालेल्या अपघात प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील राज्यातील राजकारणात चर्चेत आहे. या प्रकरणात गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता होत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात गौतमी पाटीलने प्रतिक्रिया देत भावुक आवाहन केले आहे. या प्रकरणात माझी नाहक बदनामी करण्यात येत आहे. माझी ट्रोलिंग थांबवावी असं आवाहन गौतमी पाटीलकडून करण्यात आला आहे.

“अपघात झाला तेव्हा मी त्या कारमध्ये नव्हते. तेव्हा माझी कार माझ्या कारचालकाकडे होती. जेव्हा मला अपघाताबद्दल माहिती मिळाली तेव्हा मी मदतीचा हात पुढे केला. माझे मानलेले भाऊ आहेत त्यांच्याकडून मी संबंधित रिक्षावाल्यांच्या कुटुंबीयांना मदतही पाठवली मात्र त्यांच्याकडून मदत नाकारण्यात आली. ” असे गौतमी पाटीलने म्हटले आहे.
विनाकारण टार्गेट करू नका; गौतमी भावूक
अपघात प्रकरणानंतर मला ट्रोल केलं जात आहे. मी एखादी गोष्ट चांगली केली तर ट्रोल केले जातं. मला विनाकारण टार्गेट केले जात आहे. मी आता कायदेशीर पद्धतीने उत्तर देणार आहे. माझा या गोष्टीशी काही संबंध नाही. मला कायमच ट्रोल केलं जात असून कोणत्याही गोष्टीसाठी मला कायम दोष दिला जातो, असे गौतमी पाटील म्हणाली. शिवाय गौतमीला या अपघात प्रकरणात पोलिसांकडून क्लिनचिट देखील देण्यात आली आहे, पोलिसांकडून या प्रकरणात अधिकचा तपास करण्यात येत आहे.