मुंबई लोकलमधील वाढती गर्दी जीवघेणी ठरत आहे. काही महिन्यांपूर्वी मुंब्र्यात झालेल्या लोकल अपघातानंतर स्वयंचलित दरवाजे सुरू करण्याबाबत सरकारने मोठी घोषणा केली होती. दिल्लीच्या धर्तीवर आता मुंबईतही लोकलचे दरवाजे बंद होतील. यावरुन अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर प्रकाश टाकला आहे.
लोकलच्या तिकिटात एसीचा प्रवास..
मुंबईतील लोकलला हळूहळू स्वयंचलित दरवाजे बसवणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र यासाठी सर्व लोकल एसी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मात्र लोकल एसी केल्या तरी तिकीट मात्र लोकलचं असेल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. याचा अर्थ लोकलच्या तिकिटात आता मुंबईकरांना एसीतून गारेगार प्रवास करता येणार आहे.

मुंब्र्याच्या घटनेनंतर सरकारला जाग
वाढत्या गर्दीमुळे लोकलमधून पडून दररोज अनेक प्रवाशांचा जीव जातो. मात्र मुंब्र्यात झालेल्या घटनेनंतर पाच प्रवाशांचा हकनाक बळी गेला. लोकलची दारं बंद असती तर हा अपघात झाला नसता असंही त्यावेळी सांगण्यात आलं होतं. प्रवासी संघटनांकडून सर्व लोकल एसी करण्याची मागणी केली जात होती. कारण लोकलचे दरवाजे बंद केले तर प्रवासी गुदमरतील. त्याऐवजी सर्व लोकल एसी करावेत आणि एसीचं तिकीट प्रवाशांच्या आटोक्यात असावं अशी मागणी प्रवासी संघाकडून केली जात होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईतील कारखान्यात एसी लोकलचे डबे तयार करण्यास सुरुवात झाली आहे. ऑक्टोबरपासून ही नवीन सुविधा चाचणी तत्वावर सुरू केली जाईल.











