महाराष्ट्रातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये सध्या कांदा आणि सोयाबीनच्या दरामध्ये कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. बुधवार, 19 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये दराची एकूण काय स्थिती राहिली, त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ…
कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी
राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक चांगलीच वाढताना दिसत आहे. याचा फटका आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. कारण, दरांमध्ये घसरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरंतर एकीकडे राज्यामध्ये कांद्याच्या मागणीत वाढ जरी झाली असला तरी दुसरीकडे आवक देखील तेवढीच वाढत आहे. परिणाम कांद्याच्या दरामध्ये कोणतीही लक्षवेधी सुधारणा होताना दिसत नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
कांद्याची उच्चांकी आवक, दरात घट
राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख, 89 हजार 074 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 90 हजार 997 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 316 ते 1766 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 776 क्विंटल कांद्यास 200 ते 3300 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
सोयाबीनची आवक-दर स्थिर
राज्याच्या मार्केटमध्ये 60 हजार, 299 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी वाशिम मार्केटमध्ये 16 हजार 500 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4105 ते 4660 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच जालना मार्केटमध्ये आवक झालेल्या 11 हजार, 931 क्विंटल पिवळ्या सोयाबीनला प्रतीनुसार 4150 ते 5321 रुपये प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला. त्यामुळे सोयाबीनची आवक स्थिर आहे. त्यामध्ये कोणतीही ठोस घट होत नसल्याने दरामध्ये कोणताही मोठा लक्षवेधी बदल सध्या पाहायला मिळत नाही.
सोयाबीनच्या दरात सुधारणा
यंदाच्या महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन पिकावर या नैसर्गिक आपत्तीचा मोठा परिणाम झाला आहे. सततच्या पावसामुळे पिके पाण्याखाली गेली, मुळे कुजली आणि उत्पादन क्षमता घटली. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने घेतलेले सोयाबीन पीक आता नष्ट झाल्याने त्यांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत आता राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात काहीशी सुधारणा होताना दिसत आहे.





