मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे गेल्या काही दिवासांपासून पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मंत्री तथा अजित पवार यांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे एकमेकांवर थेट टीका करताना दिसत आहेत. मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट रचला असा आरोप मनोज जरांगे यांनी केल्यानंतर या दोन्ही नेत्यांत उघड संघर्ष पाहायला मिळाला. आता मनोज जरांगेंनी त्यांना देण्यात आलेले पोलीस संरक्षण काढण्यात यावे अशी मागणी सरकारकडे केली आहे.
पोलीस संरक्षण काढून घ्या -मनोज जरांगे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आमदार धनंजय मुंडे यांना वाचवण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. स्वतःचे पोलीस संरक्षण नाकारत, आपले संरक्षण काढण्यात यावे अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे. आज जालन्यात पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्याकडे मनोज जरंगे यांचे सहकारी किशोर मरकड यांनी अर्जाद्वारे ही विनंती केली आहे.

या अर्जामध्ये आपल्या घातपाताच्या कटाचा मुख्य सूत्रधार हे धनंजय मुंडेच असल्याचं म्हटलं आहे. धनंजय मुंडे यांना सरकार वाचवत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. तसेच पोलीस संरक्षण तत्काळ काढण्याची विनंती देखील त्यांनी सरकारकडे केली आहे. त्यामुळे एकूणच मनोज जरांगे पाटलांच्या या आरोपांकडे सरकार नेमके गांभीर्याने कधी पाहणार हे देखील महत्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे सरकार मनोज जरांगेंची मागणी मान्य करेल, अशी कोणतीही शक्यता सध्या दिसत नाही.
हत्येच्या कटावरून मुंडे-जरांगेंमध्ये संघर्ष
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनजंय मुंडे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. मनोज जरांगे पाटलांनी माजी मंत्री धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप केलाय. धनंजय मुंडेंनी मला मारण्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिली, असा गंभीर आरोप जरांगेंनी केला. बीडमधून अमोल खुणे आणि दादा गरुड या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आता जरांगेंनी या प्रकरणात धक्कादायक आरोप केले मात्र मुंडेंनी हे आरोप फेटाळून लावलेत.जरांगेंच्या सनसनाटी आरोपांनंतर धनंजय मुंडे आक्रमक झालेत.. याप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचं आवाहन मुंडेंनी केलीय. तसेच पली आणि जरांगेची ब्रेनमॅपिंग, नार्को टेस्ट करा असं आव्हान मुंडेंनी केलेलं हे आव्हान जरांगेंनी स्वीकारलं आहे.











