महाराष्ट्रातील थंडीबाबत हवामान विभागाकडून मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यात तापमानातील चढ-उतार आजही कायम राहणार असून कोकण, पश्चिम व मध्य महाराष्ट्रात सकाळ-संध्याकाळ गारवा आणि दिवसा हलकी उष्णता अशी स्थिती दिसणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघरमध्ये किमान तापमानात किंचित घट किंवा वाढ जाणवली असून दुपारी तापमान 30–32°C दरम्यान राहणार आहे. हवामान विभागानुसार पुढील दोन ते तीन दिवस आकाश स्वच्छ राहून थंडी-उबदारपणाचा हा मिश्र पॅटर्न सुरूच राहील.
महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा तापमानात मोठी घसरण होण्यास सुरूवात झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील थंडीचे प्रमाण कमी झाले होते. आता मात्र वातावरणात बदल जाणवत असून तापमानात घट होऊन गारठा वाढला आहे. हवामान विभागाकडून देखील थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात आज रात्री थंडीची स्थिती काय असेल?
राज्यात आजही तापमानातील अस्थिरता कायम राहण्याची शक्यता असून अनेक जिल्ह्यांमध्ये सकाळ-संध्याकाळ गारवा आणि दिवसा उबदार हवा अशी परिस्थिती दिसून येईल. हवामान खात्याच्या माहितीनुसार, मागील दोन दिवसांत काही भागांत थंडी वाढली तर काही ठिकाणी किंचित कमी झाली होती. मात्र आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य भागात हवा प्रामुख्याने कोरडी राहणार आहे. आकाश स्वच्छ असल्याने दिवसा तापमानात थोडी वाढ जाणवेल, तर रात्री पुन्हा गारवा टिकून राहील. पुढील दोन ते तीन दिवस हेच हवामान सुरू राहणार असल्याचे संकेत विभागाने दिले आहेत. दरम्यान तापमानाचा पारा १० ते १२ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात थंडीत वाढ; आरोग्य जपा !
दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात तापमानाचा पारा आणखी खाली येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. कडाक्याच्या थंडीत आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. थंड तापमानामुळे सर्दी, खोकला, ताप आणि सांधेदुखी यांसारख्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे शरीर उबदार राहील अशी कपडे घालणे, गरम पाणी पिणे आणि पौष्टिक आहार घेणे महत्त्वाचे आहे.
सकाळी कोमट पाण्याने अंघोळ करणे, वाफ घेणे आणि घरात पुरेशी हवेशीर व्यवस्था ठेवणे फायदेशीर ठरते. वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि अस्थमा किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी अतिरिक्त काळजी घ्यावी. व्यायाम करताना शरीरावर थंडीचा परिणाम होऊ नये म्हणून योग्य कपडे वापरावेत. पुरेसे पाणी पिणे आणि विश्रांती घेणेही आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.
थंडीत हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. कारण, तापमान घटल्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तदाब वाढतो. अशा परिस्थितीत हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढणे किंवा आधीपासून हृदयाचे विकार असलेल्या व्यक्तींनी खास काळजी घेणे आवश्यक आहे.











