Mumbai Dabbawala – मराठा आरक्षणाचा निर्णायक लढा संघर्ष योध्दा मनोज जरांगे-पाटील यांनी पुकारला आहे. मनोज जरांगे-पाटील आपल्या तमाम ज्ञाती बांधवांना घेऊन संघर्षयात्रेच्या माध्यमातून मुंबईकडे कूच केले आहे. दिनांक २८ ॲागस्ट रोजी रात्री त्यांची संघर्ष यात्रा मुंबईच्या वेशीवर धडकणार आहे. या संघर्षयात्रेचे स्वागत मुंबईचा डबेवाला मुंबईच्या वेशीवर करणार आहे. आपण जो मराठा आरक्षणा लढा पुकारला आहे, त्या लढ्याला “मुंबई डबेवाला असोसिएशन“चा संपुर्ण पाठिंबा आहे. असं असोसिएशन“चे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी म्हटलं आहे.
आरक्षणामुळे विकासांचे दालन खुले होईल
मुंबईचा डबेवाला बांधव हा मुळचा मावळातील मराठा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचा यज्ञ मांडला त्या यज्ञात सर्व प्रथम आहूती आम्ही मावळ्यांनी दिली. माझा आजोबा डबेवाला, माझा वडील डबेवाला, आम्ही डबेवाले, आम्ही पिढ्यांन पिढ्या डबेच पोहोचवायचे का? जर मराठा आरक्षण मिळाले तर आमच्या मुलांना शिक्षणात सवलत मिळेल, फिमध्ये सवलत मिळेल, ती शिकतील नोकरीत आरक्षण मिळाले तर त्यांना ही नोकरी मिळेल. मराठा आरक्षणामुळे आम्हा मराठ्यांना विकासांचे नवीन दालन खुले होईल. तेव्हा आम्हाला मराठा आरक्षण पाहीजे आहे, असं मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी म्हटलं आहे.
सरकारला परिणाम भोगावे लागतील
एक काळ होता आमच्या हातात ढाल-तलवार होती. आम्ही गड चढत होतो. गड जिंकत होतो. आज साडेतिनशे वर्ष झाली त्याला, आता आम्ही हातात जेवणाचा डबा घेऊन दादर आणी शिड्या चढून डबा पोहचवतो आहे. पण याचा ही आम्हाला गर्व आहे. मराठे शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. सरकारने काही आगळीक करू नये. जर सरकार काही आगळीक करेल तर त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील. असा इशाराही मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिला आहे.





