महाराष्ट्रात रेल्वेचे जाळे विस्तारणार; 5,098 किमी लांबीच्या नव्या रेल्वेमार्गांना मंजूरी

महाराष्ट्रातील रेल्वे जाळ्याच्या विकास आणि विस्तार सुरू झाला आहे. केंद्र सरकारने विक्रमी निधीसह महाराष्ट्रात रेल्वे विकासाला गती दिली आहे. अशा परिस्थितीत आता महाराष्ट्रात ५,०९८ किमी लांबीच्या नव्या रेल्वेमार्गांची निर्मिती होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

रेल्वे सेवा ही सर्वसामान्य प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची जीवनरेखा मानली जाते. परवडणारा भाडा, सोयीस्कर प्रवास आणि दूरवरच्या ठिकाणांना जोडण्याची क्षमता यामुळे रेल्वे भारतीय जनतेचे मुख्य वाहतूक साधन बनले आहे. रोजच्या प्रवासापासून लांब पल्ल्याच्या यात्रांपर्यंत रेल्वे सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय उपलब्ध करून देते. ग्रामीण भाग, छोटे शहर आणि महानगरांना जोडून आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक संधींना चालना देते. प्रवासी सुविधांमध्ये होणारी वाढ, नवीन मार्गांची उभारणी आणि सेवेतील सुधारणा यामुळे प्रवासाचा अनुभव आणखी सुलभ आणि दर्जेदार होत आहे. अशा परिस्थितीत आता महाराष्ट्रात ५,०९८ किमी लांबीच्या नव्या रेल्वेमार्गांची निर्मिती होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

5,098 किमी लांबीच्या नव्या रेल्वेमार्गांना मंजूरी

महाराष्ट्रातील रेल्वे जाळ्याच्या विकास आणि विस्तार सुरू झाला आहे. केंद्र सरकारने विक्रमी निधीसह महाराष्ट्रात रेल्वे विकासाला गती दिली आहे. राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे, माहिती व प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वाढीव अर्थसंकल्पीय सहाय्य, जलद प्रकल्प अंमलबजावणी आणि व्यापक स्थानक पुनर्विकास उपक्रमांद्वारे अलिकडच्या वर्षांमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीवर प्रकाश टाकला. गेल्या दशकात महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक अनेक पटींनी वाढली आहे, असे त्यांनी म्हटले. 2009-14 दरम्यान वार्षिक खर्च सरासरी 1,171 कोटी रुपये होता, तो 20 पट वाढून 2025-26 मध्ये 23,778 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, ज्यामुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणावर विस्तार आणि आधुनिकीकरणाची कामे शक्य झाली आहेत.

2009-14 आणि 2014-25 या काळात महाराष्ट्र राज्यातील पूर्णपणे / अंशतः नवीन लोहमार्ग सुरू करण्याचे / टाकण्याचे तपशील खालीलप्रमाणे आहे. 01 एप्रिल 2025 पर्यंत महाराष्ट्रात पूर्णपणे / अंशतः मार्गांसाठी 89,780 कोटी रुपयांच्या खर्चाच्या एकूण 5,098 किमी लांबीच्या 38 प्रकल्पांना (11 नवीन मार्ग, 02 गेज रूपांतरण आणि 25 दुहेरीकरण) मंजुरी देण्यात आली.

महाराष्ट्रातील प्रगतीपथावर असणारे रेल्वे प्रकल्प

  • अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ नवीन मार्गिका (261 किमी) – 4,957 कोटी
  • बारामती-लोणंद नवीन मार्गिका (64 किमी) – 1,844 कोटी
  • वर्धा-नांदेड नवीन मार्गिका (284 किमी) – 3,445 कोटी
  • इंदूर-मनमाड नवीन मार्गिका (360 Km) – 18,529 कोटी
  • वडसा-गडचिरोली नवीन मार्ग (52 किमी) – 1,886 कोटी
  • जालना-जळगाव नवीन मार्ग (174 किमी) – 5,804 कोटी
  • दौंड-मनमाड दुहेरीकरण (236 किमी) – 3,037 कोटी
  • कल्याण-कसारा तिसरा मार्ग (68 किमी) – 1,433 कोटी
  • वर्धा-नागपूर 3रा मार्ग (76 किमी) – 698 कोटी
  • वर्धा-बल्लारशाह 3 या मार्ग (132 किमी) – 1,385 कोटी
  • इटारसी-नागपूर 3रा मार्ग (280 किमी) – 2,450 कोटी
  • राजनांदगाव-नागपूर 3 रा मार्ग (228 किमी) – 3,545 कोटी
  • वर्धा-नागपूर चौथी मार्गिका (79 किमी) – 1,137 कोटी
  • जळगाव-मनमाड चौथी मार्गिका (160 किमी) – 2,574 कोटी
  • भुसावळ-खंडवा तिसरा आणि चौथा मार्ग (131 किमी) – 3,285 कोटी
याशिवाय, गेल्या तीन वर्षात म्हणजेच 2022-23, 2023-24, 2024-25 आणि चालू आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये महाराष्ट्र राज्यात पूर्णत: / अंशतः येणारे 8,603 किमी लांबीचे 98 सर्वेक्षणे (29 नवीन मार्ग, 2 गेज रूपांतरण आणि 67 दुहेरीकरण) मंजूर करण्यात आली आहेत.
केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी असेही अधोरेखित केले की, लोहमार्गांचे उन्नतीकरण आणि नूतनीकरण ही एक सतत आणि चालू प्रक्रिया आहे. लोहमार्गाचे नूतनीकरण कालावधी, वाहतूक, स्थिती इत्यादींवर आधारित, निर्धारित निकषांनुसार केले जाते. 2025-26 दरम्यान महाराष्ट्रासह देशभरात (नोव्हेंबर 2025 पर्यंत), सुमारे 5,100 किमी लोहमार्गांचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे, 2014-25 दरम्यान (नोव्हेंबर 2025 पर्यंत) सुमारे 52,000 किमी लोहमार्गांचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यातील रेल्वे पायाभूत सुविधांचे प्रकल्प मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे , दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, दक्षिण पश्चिम रेल्वे व पश्चिम रेल्वे विभागांच्या अखत्यारीत येतात. वर्ष 2025-26 मध्ये नोव्हेंबर 2025 पर्यंत बदललेल्या रेल्वेमार्गाची लांबी किती जाणून घेऊयात.

2025-26 मध्ये बदललेल्या रेल्वेमार्गांची लांबी

  • मध्य रेल्वे – 271 किलोमीटर
  • दक्षिण मध्य रेल्वे – 505 किलोमीटर
  • दक्षिण पूर्व मध्य रेल्वे – 196 किलोमीटर
  • पश्चिम रेल्वे – 345 किलोमीटर
  • दक्षिण पश्चिम रेल्वे – 155 किलोमीटर
  • आतापर्यंत अमृत भारत स्थानक योजनेत 1337 स्थानकांचा समावेश केला गेला असून त्यातील 132 स्थानके महाराष्ट्रात आहेत.

महाराष्ट्र राज्यातील अमृत भारत स्थानक योजनेतील विकासकामे वेगाने सुरु आहेत. महाराष्ट्र राज्यातील पूर्ण झालेल्या स्थानकांची संख्या 17 आहे. यामध्ये आमगाव, बारामती, चांदा किल्ला, चिंचपोकळी, देवळाली, धुळे, केडगाव, लासलगाव, लोणंद जंक्शन, माटुंगा, मूर्तिजापूर जंक्शन, नेताजी सुभाष चंद्र बोस नांदुरा, इतवारी जंक्शन, परळ, सावदा, शहाड, वडाळा रोड यांचा समावेश आहे.

वाठार स्थानक – नवीन छत, स्थानक इमारतीची सुधारणा, पाणीव्यवस्था, नवीन मुख्य प्रवेश, वाहनतळ,आसपासचा भाग, प्रवेशद्वार लॉबी सुधारणा, वाहनतळाची कंपाऊंड भिंत, फलाट क्रमांक 1 वरील निवारा स्थळ, फलाटांचा पृष्ठभाग नूतनीकरण, प्रतीक्षागृह, दिशादर्शक पाट्या व दिव्यांची डागडुजी पूर्ण झाली असून शेवटचा हात फिरवणे सुरु आहे.
नांदगाव स्थानक – प्रवेश व निकास द्वार , फलाटांचा पृष्ठभाग नूतनीकरण, फलाटावरील छप्पर, स्थानक इमारतीची सुधारणा, तिकीट कार्यालय, रेल्वेमार्गावरील पादचारी पूल, स्थानकाची कंपाउंड भिंत, आसपासची जागा, वाहनतळ, दिशादर्शक पाट्या व दिव्यांची डागडुजी पूर्ण झाली असून शेवटचा हात फिरवणे सुरु आहे.
हडपसर स्थानक – नवीन स्थानक इमारत, प्रतीक्षागृह, 12 मीटर लांबीचा पादचारी पूल, जमिनीखालील टाकी, फलाटावरील छप्पर, फलाटांचा पृष्ठभाग नूतनीकरण, आसपासची जागा, दिशादर्शक पाट्या व दिवे, तसेच उद्वाहन, सरकते जिने, बागेचे सुशोभीकरण ही कामे पूर्ण झाली असून शेवटचा हात फिरवणे सुरु आहे.

About Author

Rohit Shinde

Other Latest News