महसूल सेवक हा महसूल व्यवस्थेतील खरंतर एक महत्वाचा घटक आहे. या महसूल सेवकांच्या अनेक प्रलंबित मागण्या शासनाकडे होत्या, त्यावर आता सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील महसूल सेवकांचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल सेवकांना तलाठी भरतीत प्राधान्य देण्याचे आश्वासन दिलं.
तलाठी भरतीत महसूल सेवकांना प्राधान्य
महसूलमंत्र्यांनी महसूल सेवकांना न्याय देण्यासाठी पर्याय सूचवला. त्यांच्या अनुभवानुसार तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवून, ज्यांना किमान पाच वर्षांचा अनुभव आहे, त्यांना 25 अतिरिक्त गुण देण्याचा प्रस्ताव मांडला. अधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच शासन निर्णय निघण्याची शक्यता आहे. बैठकीत महसूलमंत्र्यांनी महसूल सेवकांच्या इतर मागण्यांबाबतही सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. पूर्वीच त्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून, सरकार त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवेल, असेही बावनकुळे म्हणाले.

महसूल सेवकांचे ग्रामीण भागातील महत्व
महसूल सेवक हे ग्रामीण भागातील प्रशासनाचे अत्यंत महत्त्वाचे अंग आहेत. हे लोक थेट गावकऱ्यांशी संपर्कात राहून शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी करतात आणि नागरिकांना विविध प्रकारच्या सरकारी योजना व सुविधांबाबत मार्गदर्शन करतात. महसूल सेवक जमीनविवाद, करसंकलन, जमिनीच्या नोंदी, वसतिगृह, ग्राम विकास योजना इत्यादींशी संबंधित कामे पाहतात, ज्यामुळे गावकऱ्यांना शासनाशी सहज संपर्क साधता येतो.
ग्रामीण भागात, जिथे तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रशासनाची पोहोच कमी असते, तेथे महसूल सेवक लोकांसाठी प्रशासनाचे प्राथमिक प्रतिनिधी ठरतात. ते गावातील रहिवाशांना सरकारी योजना जसे की प्रधानमंत्री योजना, शेतकऱ्यांसाठी सबसिडी, सामाजिक सुरक्षा योजनेची माहिती देतात आणि अर्ज भरण्यापासून ते अंमलबजावणीपर्यंत मार्गदर्शन करतात. त्यामुळे नागरिकांचा प्रशासनावर विश्वास वाढतो आणि शासनाचे उद्दिष्ट गावात पोहोचते. अशा महसूल सेवकांना दिलासा देण्यासाठी शासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे.











