शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे कारण शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे आणि पात्र शिक्षकांची निवड करणे हे या निर्णयामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे. टीईटी परीक्षेमुळे शिक्षकांची अध्यापन क्षमता, विषयज्ञान आणि शैक्षणिक कौशल्यांची तपासणी होते. अशा संपूर्ण परिस्थितीत लवकरच टीईटी परीक्षा होणार आहे. त्यामुळे टीईटी परीक्षेसाठी काही नवे नियम खरंतर शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आले आहेत.
23 नोव्हेंबर रोजीच होणार टीईटी परीक्षा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने 23 नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. या परीक्षेची कठीण पातळी लक्षात घेता उमेदवारांकडून जोरदार तयारी केली जात असली तरी, परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी काही महत्त्वाच्या सूचना लक्षात घेणे आवश्यक ठरणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यभर कडक पाळत ठेवली जाणार आहे. राज्यातील पहिली ते आठवी इयत्तांपर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा देणे बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर रोजी सर्व शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा सक्तीची करण्याचा निर्णय दिल्यानंतर शिक्षक संघटनांनी या निर्णयाचा विरोध दर्शवला होता.

टीईटीतील गैरप्रकार टाळण्यासाठी उपाय
राज्यभरातील एकूण 4 लाख 75 हजार 668 उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. प्राथमिक स्तरावरील (पेपर-1) परीक्षेसाठी 2 लाख 30 हजार 333 उमेदवारांनी नोंदणी केली आहे, तर माध्यमिक स्तरावरील (पेपर-2) परीक्षेसाठी 2 लाख 72 हजार 335 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. उमेदवारांची वाढलेली संख्या लक्षात घेता परीक्षा केंद्रांची संख्या यंदा वाढवण्यात आली आहे.
या वेळी गैरप्रकार टाळण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. सर्व केंद्रांवर एकाचवेळी डिजिटल कॅमेऱ्याच्या निगराणीत परीक्षा घेतली जाईल. उमेदवारांची बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवली जाणार असून, छायाचित्रांची ओळख पडताळणीसाठी एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. अशा कठोर उपाययोजनांमुळे यंदाची टीईटी परीक्षा अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे एकूणच टीईटी परीक्षेसाठी कठोर अशी नियमावली समोर येत आहे.











