अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला मत्स्य व्यावसायिकांना राज्य सरकार आर्थिक मदत करणार, मंत्री नितेश राणे यांची ग्वाही

Astha Sutar

Nitesh Rane – मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्य व्यवसायालाही फटका बसला आहे. जलाशय, तलाव, मत्स्यपालन केंद्रे पाण्याखाली गेली असून बोटी, होडी, जाळी, मत्स्यबीज यासह उपकरणांचे आणि मत्स्यपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील मत्स्यव्यवसायिकांना बळ देण्यासाठी राज्य सरकारकडून आर्थिक केली जाणार आहे. असे बंदरे विभागाचे मंत्री नितेश राणे नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर सांगितले.

मत्स्य व्यावसायिक मदतीपासून वंचित राहणार नाही

दरम्यान, प्रत्येक मत्स्यपालकांचे नुकसान व्यवस्थित नोंदविले गेले पाहिजे, शेतकऱ्याप्रमाणेच मत्स्यपालकांनाही शासनाची मदत मिळाली पाहिजे यासाठी नुकसानग्रस्त मत्स्यव्यावसायिकांचे तत्परतेने पंचनामे करून शासनाला अहवाल पाठवा असे निर्देशही त्यांनी दिले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला मत्स्य व्यावसायिक मदतीपासून वंचित राहणार नाही, शासन म्हणून आपण मत्स्य व्यावसायिकांच्या पाठीशी असल्याचे सांगुन त्यांनी उपस्थित मत्स्य व्यावसायिकांना धीर दिला. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री राणे म्हणाले, प्रत्येक मत्स्यपालकाचे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान अचूक नोंदविले गेले पाहिजे, शेतकऱ्याप्रमाणेच मत्स्यपालकानांही शासनाची मदत मिळाली पाहिजे. 

तातडीने पंचनामे करावे

पंचनामे अचूक करून त्याबाबतचा अहवाल तातडीने शासनाकडे पाठवा जेणेकरून त्याआधारे तातडीने मदत देता येईल. मत्स्यपालकांना या संकटातून उभे करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्या दृष्टीने प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून काम करावे. जलसंपदा विभागाने गाळ काढण्याबाबतचा कार्यक्रम तयार करावा. याबाबत राज्यस्तरीय कार्यक्रमाची आखणी मंत्रालय पातळीवरून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नुकसान भरपाईसोबत मत्स्यव्यावसयिकांना विविध सवलती देण्यासंदर्भात शासन सकारात्मक आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने ज्या जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाले त्याठिकाणचे मनुष्यबळ ज्याठिकाणी पंचनामे बाकी आहेत तिथे तातडीने उपलब्ध करून द्यावे.

ताज्या बातम्या