जाहिरातीबाजीपेक्षा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सरकारने तत्काळ मदत करावी, उद्धव ठाकरे यांची मागणी

Astha Sutar

Uddhav Thackeray – सध्या राज्यातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा कहर सुरु आहे. जालना, परभणी, दक्षिण नगर, सोलापूर, लातूर, धाराशिव या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मराठवाड्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसल्याचे चित्र सद्यस्थितीला आहे. त्यामुळे या भागांत शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. जीवित आणि वित्तहानी झाली आहे. आज या ठिकाणी मंत्री दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करत आहे. दरम्यान, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा, अशी मागणी शिवसेना (उबाठा) उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

लाखो हेक्टर जमीनीचे नुकसान

सध्या मराठवाड्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचे वैशिष्ट म्हणजे आजपर्यंत दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या बीड, लातूर, धाराशिव, जालना, संभाजीनगर, नांदेड, परभणी अशा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याचे पीक पाण्यात गेलं आहे. मराठवाड्यातला शेतकरी बेसावध होता. इतक्या वर्षांपासून कधी ढगफुटी, अतिवृष्टी त्यानं पाहिली नव्हती. नाही म्हणायला काही वर्षांपूर्वी धाराशिव भागात एकदा गारपीट झाली होती. पण आता लाखो हेक्टर जमीन खरवडून निघाली आहे आणि खरीप पिकं डोळ्यादेखत पाण्यात गेली आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. त्या काळात दुष्काळ परिस्थिती, अतिवृष्टी, चक्रीवादळ यासारख्या आपत्तीने शेतकरी अक्षरशः रडवेला झाला. पण तेव्हा देखील केंद्राने कोणतीही मदत केली नाही. असं ठाकरे म्हणाले.

मंत्री मंत्रालयात बसून ऑनलाइन सल्ले देताहेत

शेती AI च्या मदतीने करा असा सल्ला ही सरकार शेतकऱ्यांना देतंय. पण अशी नैसर्गिक आपत्ती येऊनही महायुती सरकारचे मंत्री आणि अधिकारी तिकडे मंत्रालयात बसून ऑनलाइन सल्ले देत आहेत. एकही मंत्री बांधावर फिरकलेला नाही. मराठवाड्याला सापत्न वागणूक देताय. साधं हेलिकॉप्टरने सुद्धा पूर परिस्थितीची पाहणी करायला सीएम आणि DCM ना वेळ नाही. नुसते मंत्रालयातल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन टीव्ही समोर पाहणी करण्याचे नाटक सुरू आहे आणि टेबल न्यूज तयार करणे सुरू आहे. अशी टिका उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर केली.

केंद्राने तातडीने १० हजार कोटींची मदत जाहीर करावी

जमीन वाहून गेल्याने रब्बी धोक्यात आली आहे. गुरे ढोरे वाहून गेले, रस्ते वाहून गेले. मराठवाड्यात शेतीला जो फटका बसला आहे, त्यातून ते कसे सावरणार? केंद्राने किमान तातडीने दहा हजार कोटींची मदत जाहीर करावी. अशी मागणी ठाकरेंनी केली. शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ नुकसानीचे पैसे जमा करावे. या खात्यांमधून बँकांनी कर्जाच्या हप्त्याची रक्कम वळती करून घेऊ नये, यासाठी तसे निर्देश द्यावे. शेतकऱ्यांच्या बाबतीतही पंचनामे आणि नियम तपासण्यात वेळ घालवू नका. पहिल्यांदा छान भरपाई बँक खात्यामध्ये जमा करा. आणि नंतर त्याची शहानिशा करत बसा. असं ठाकरे म्हणाले.

ताज्या बातम्या