Maharashtra Politics: उद्धव ठाकरे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर, ठाकरेंचा सरकारला घेरण्याचा प्रयत्न

ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शेतकऱ्यांची कर्जमाफी, तुटपूंजी नुकसान भरपाई आदी मुद्द्यांवर सरकारला घेरणार हे यामुळे निश्चित झाले आहे.

मराठवाडा प्रदेशात अलीकडील पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुराच्या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. सोयाबीन, तूर, कापूस आणि मका यांसारख्या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने हजारो कोटींचे पॅकेज शेतकऱ्यांसाठी घोषित केले खरे, मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचलेली नाही. अशा परिस्थितीत ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यातील शेतकरी संवाद दौरा चालू झाला आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शेतकऱ्यांची कर्जमाफी, तुटपूंजी नुकसान भरपाई आदी मुद्द्यांवर सरकारला घेरणार हे यामुळे निश्चित झाले आहे.

उद्धव ठाकरे सरकारला घेरणार !

उद्धव ठाकरे यांनी आजपासून ५ नोव्हेंबर रोजी सलग चार दिवसांच्या वादळी दौऱ्याला सुरुवात केली आहे. महायुतीतील शिंदे-फडणवीस-पवार सरकारला दगाबाज रे या शब्दात थेट आव्हान दिले आहे. सरकारने घोषित केलेल्या ३१ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचे काय झाले, शेतकऱ्यांपर्यंत खरंच किती रक्कम पोहोचली आणि जूनमध्ये कर्जमाफीनंतर आता अतिवृष्टीमुळे कर्जाचे हप्ते कोण फेडणार, असे प्रश्नही ठाकरे गटाने केला आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचा संवाद दौरा असणार आहे.

तात्काळ कर्जमाफी करा -ठाकरे

दरम्यान, तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. ” कर्जमाफी करण्या आधी माती तर द्या. मग कर्ज द्या. मी हा विषय सोडणार नाही. तुम्हाला न्याय मिळेपर्यंत तुमच्यासोबत राहणार. केंद्रीय पथक फिरतंय. दिवाळीच्या आत पैसे देणार होते. दिवाळी झाली. तुळशीचं लग्न झालंय. पंचांग काढत आहेत. मुहूर्तमागे मुहूर्त काढत आहेत. पण मदतीच्या नावाने बोंबाबोंब.  आम्ही तुमच्यासोबत राहणार आहोत. आम्हाला जूनची मुदत मान्य नाही. कर्जमुक्ती करा. आताच्या आता कर्जमुक्ती करा, तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये द्या,” अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

ठाकरेंच्या दौऱ्याचे नियोजन कसे ?

उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात ‘दगाबाजरे’ संवाद दौऱ्याची घोषणा केली आहे, ज्या अंतर्गत ते अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. ‘हे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांशी दगाबाजी आहे’, असा थेट आरोप करत, सरकारने जाहीर केलेली मदत फसवी असल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात ठाकरे मराठवाड्यातील आठही जिल्हे आणि सोलापूरला भेट देणार आहेत. या दौऱ्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आणि बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरल्याची पार्श्वभूमी आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मात्र, ‘दोन मिनिटं शेतकरी, दहा मिनिटं कार्यकर्ते’ असे म्हणत या दौऱ्याची खिल्ली उडवली आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्याचा आणि शेतकऱ्यांच्या बांधावरून पक्षाची बांधणी करण्याचा ठाकरेंचा प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News