MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

छत्रपती संभाजीनगर शहरात पाणीपुरवठा विस्कळीत; नागरिकांची तारांबळ, कधी होणार सुरळीत?

Written by:Rohit Shinde
सततच्या दुरूस्तीच्या कामांमुळे छत्रपती संभाजीनगर शहरात पाणीपुरवठा चांगलाच विस्कळीत झाला आहे. अशा परिस्थितीत पाणीबाणीची ही स्थिती पुढील आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांची सततच्या पाणीपुरवठा बंदमुळे चांगलीच तारांबळ होताना दिसत आहे. नागरिकांना चांगलाच मनस्ताप होत आहे. महापालिका आणि पाणी पुरवठा विभागाच्या विरोधात शहरातील नागरिकांमध्ये सध्या तीव्र असंतोष असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

आणखी किती दिवस शट-डाऊन राहणार ?

छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी मिळण्यासाठी नागरिकांना आधीच 6 ते 7 दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. आता नवीन 2500 मिमी जलवाहिनीची जोडणी संथ गतीने होत असल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. सहा दिवसांचे घोषित शटडाऊन पूर्ण झाले असले तरी काम मोठ्या प्रमाणात बाकी असल्याने ते आणखी दोन दिवस वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान टाकण्यात येणाऱ्या या मुख्य जलवाहिनीतील 130 मीटर गॅपपैकी सध्या फक्त 35 मीटरची जोडणी पूर्ण झाली आहे. उर्वरित 95 मीटरचे काम टाकळी परिसरात सुरू असून ते तांत्रिकदृष्ट्या अत्यंत किचकट असल्याचे समजते. त्यामुळे जुन्या 900 मिमी पाईपलाईनवर देण्यात आलेला शटडाऊन अपेक्षेपेक्षा जास्त लांबला आहे.

पाणीपुरवठा विस्कळीत; नागरिकांची तारांबळ

र्वरित जोडणीसाठी शटडाऊनची आवश्यकता नाही; मात्र टाकळी येथील कठीण काम पूर्ण होईपर्यंत पाणीवाहिनी सुरू करता येणार नाही. पुढील दोन दिवसांत हे काम पूर्ण करण्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, शटडाऊन वाढल्याने शहरातील पाणीपुरवठा अधिकच विस्कळीत झाला आहे. अनेक भागांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळत असून, नागरिकांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. घरगुती वापरापासून हॉस्पिटल्स, हॉटेल्स आणि व्यवसायांपर्यंत याचा व्यापक परिणाम जाणवत आहे. नागरिकांची प्रतीक्षा वाढत असताना, प्रशासन पुढील दोन दिवसांत काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठा नेमका कधी सुरळीत होणार, ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.