MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

2006 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण; आरोपींना निर्दोष ठरवणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

Written by:Rohit Shinde
Published:
मुंबई हायकोर्टाने 2006 सालच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 12 दोषींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती. या निर्णयाला आता सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
2006 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण; आरोपींना निर्दोष ठरवणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

मुंबई हायकोर्टाने 2006 सालच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 12 दोषींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती. या निर्णयाला आता सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. महाराष्ट्र सरकारने हायकोर्टाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा या प्रकरणातील तपास अद्याप सुरू आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती

मुंबईला हादरवून टाकणाऱ्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाने 21 जुलै 2025 रोजी निर्दोष मुक्तता केली होती. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांदक यांच्या विशेष खंडपीठाने हा निकाल दिला होता. या निर्णयामुळे 9 वर्षांपूर्वी सत्र न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा रद्द झाली होती. यातील एकूण 12 दोषींना तात्काळ तुरुंगातून सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. दोषींनी या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते तर राज्य सरकारने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गेल्या सहा महिन्यांपासून यावर सुनावणी सुरू होती.

निर्दोष मुक्तता; अनेक प्रश्न कायम

2015 साली विशेष न्यायालयाने याप्रकरणातील 12 आरोपींना दोषी ठरवत पाच जणांना फाशी आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पोलिसांनी आपल्याला मारहाण करुन जबाब नोंदवले असा आरोप याप्रकरणातील दोषींनी केला होता. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर या आरोपींनी आनंद व्यक्त केला.

2006 ला नेमकं काय घडलं?

११ जुलै २००६ रोजी मुंबई शहरात एक अत्यंत भयावह दहशतवादी घटना घडली, ज्यात पश्चिम रेल्वे मार्गावरील सात लोकल ट्रेनमध्ये काही मिनिटांच्या अंतराने स्फोट घडवून आणण्यात आले. संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी, सुमारे ६:२४ ते ६:३५ या दरम्यान, माटुंगा, माहिम, बांद्रा, जोगेश्वरी, बोरीवली, खांडिवली आणि मीरा रोड या स्टेशनजवळ असलेल्या ट्रेनमध्ये प्रेशर कुकरमध्ये ठेवलेले स्फोटक वापरून एकामागून एक सात बॉम्बस्फोट घडवण्यात आले. या स्फोटांमध्ये २०९ लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे ७०० लोक गंभीर जखमी झाले. संपूर्ण मुंबई शहरात काही तासातच भीतीचे आणि अराजकतेचे वातावरण निर्माण झाले.
या हल्ल्यांमागे ‘लष्कर-ए-तोयबा’ आणि ‘SIMI’ या दहशतवादी संघटनांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आणि अनेक संशयितांना अटक करण्यात आली. या हल्ल्यांचा उद्देश भारतात धार्मिक तेढ वाढवणे आणि मुंबईसारख्या आर्थिक राजधानीमध्ये अस्थिरता निर्माण करणे हा होता. ही घटना देशातील रेल्वेवर झालेल्या सर्वात भयानक दहशतवादी घटनांपैकी एक मानली जाते आणि यानंतर रेल्वे सुरक्षा व्यवस्था आणि गुप्तचर प्रणालीमध्ये मोठे बदल करण्यात आले.