पंतप्रधान स्वनिधी योजनेबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैटकीत पीएम स्वनिधी योजनेच्या फेररचनेला आणि मुदतवाढीस मान्यता देण्यात आली आहे. नेमके काय बदल करण्यात आले आहेत आणि या बदलांचा सर्वसामान्यांना कसा फायदा होणार आहे, त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ…
स्वनिधी योजनेत काही मोठे बदल
प्रधानमंत्री रस्त्यावरील विक्रेते आत्मनिर्भर निधी योजनेची फेररचना करण्यात आली आणि त्यास मुदतवाढ देण्यात आली. योजनेचा पहिला टप्पा 31 डिसेंबर 2024 पर्यंत होता.पीएम स्वनिधी योजनेला मुदतवाढ 31 मार्च 2030 पर्यंत देण्यात आली आहे. यासाठी 7332 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. योजनेच्या फेररचनेनंतर 50 लाख नव्या लाभार्थ्यांसह एकूण 1.15 कोटी लाभार्थ्यांपर्यंत पीएम स्वनिधीचा लाभ पोहोचवण्याचं उद्दिष्ठ आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांच्यासह वित्तीय सेवा मंत्रालयाकडून योजनेची अंमलबजावणी केली जाईल. वित्तीय सेवा मंत्रालयाकडून कर्ज आणि क्रेडिट कार्ड सुविधा बँक आणि वित्तीय संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातील.
फेरबदल केल्याने काय होणार?
फेरबदलांनुसार पहिल्या टप्प्यात फेरीवाले किंवा रस्त्यावरील विक्रेत्यांना पूर्वी जे 10 हजार रुपयांचं कर्ज मिळायचं ते आता 15 हजार रुपये मिळेल. दुसऱ्या टप्प्यातील कर्ज 20 हजारांवरन वाढवून 25000 हजार रुपये करण्यात आलं आहे. तिसऱ्या टप्प्यातील कर्ज 50000 रुपये मिळेल, त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पीएम स्वनिधी योजनेच्या सदस्यांना यूपीआय लिंक्ड रुपे क्रेडिट कार्ड दिलं जाईल.क्रेडिट कार्ड दुसऱ्या टप्प्यातील कर्ज परतफेड केल्यानंतर मिळेल. याशिवाय डिजीटल कॅशबॅक इन्सेन्टिव्ह देखील रिटेल आणि होलसेल व्यवहारांसाठी मिळेल. याशिवाय पीएम स्वनिधीच्या सदस्यांना 1600 रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील दिला जाणार आहे. त्यामुळे या योजनेचा आगामी काळात खरंतर मोठा फायदा होणार आहे.





