Maharashtra Politics : भाजप हा दगाबाज पक्ष, उद्धव ठाकरेंसारखी शिंदेंची अवस्था होणार

Asavari Khedekar Burumbadkar

Maharashtra Politics | महाराष्ट्रात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे सत्तेतील एकनाथ शिंदे यांचे आमदार भाजपवर नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला शिंदे यांच्या सर्व मंत्र्यांनी दांडी मारली होती. सत्तेतील मित्रपक्ष असतानाही भाजप आमच्याच पक्षातील नेत्यांचा पक्षप्रवेश करत असल्याचा शिंदे गटाचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर थेट अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहेत. त्यातच आता प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत खळबळजनक दावा केलाय. उद्धव ठाकरेंप्रमाणेच एकनाथ शिंदे यांची अवस्था होणार कारण गरज संपताच भाजप शत्रूप्रमाणे वागतो असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे

काय म्हणाले बच्चू कडू

प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, मित्रांना गरजेपुरते सोबत ठेवणे हाच भाजपाचा अजेंडा आहे. महायुती ही तीन पक्षांची युती आहे. परंतु भारतीय जनता पक्ष आपले वर्चस्व कुठेच सोडणार नाही. कारण भाजपा चांगला दुष्मन असू शकतो. पण तो कधीच चांगला मित्र होऊ शकत नाही. भाजपा मित्रांसोबत बेईमानी करतो. भाजपाकडून दगाबाजी केली जाते. गरज संपली की भाजपा मित्रपक्षांना शत्रूसारखी वागणूक देते. त्यामुळे जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत झाले. तेच एकनाथ शिंदे यांच्यासोबतही होईल. जो पक्ष झेप घेतो. त्या पक्षाचे भाजपाकडून पंख छाटले जातात, अशा शब्दांत बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला. Maharashtra Politics

एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना (Maharashtra Politics)

दरम्यान शिंदे गटाच्या नाराजीच्या चर्चेदरम्यानच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचले असून अमित शाह यांच्यासह दिल्लीतील वरिष्ठ भाजप नेत्यांची भेट घेणार आहेत. एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाल्याच कळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. शिवसेना पक्षातील मंत्री आणि एकनाथ शिंदेंची वाढती नाराजी दूर कशी करायची, याबाबत दोन्ही नेत्यांच्या बैठकीत चर्चा पार पडली असे बोलले जात आहे.

ताज्या बातम्या