Shivsena – उद्धव ठाकरे हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. गुरुवारी इंडिया आघाडीच्या बैठकीत उध्दव ठाकरे हे शेवटच्या रांगेत बसल्याचा फोटो व्हायरल होत आहे. यावरुन शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी प्रतिकात्मक आंदोलन केले. हिंदुत्व आणि बाळासाहेबांची साथ सोडली. त्यामुळं त्यांची ही अवस्था झाली आहे. त्यामुळं काँग्रेसचरणी लीन झालेल्या उबाठाला माफ करा, अशी घोषणाबाजी करत आज शिंदे गटाने आंदोलन केले. यावेळी आ. मनीषा कायंदे, प्रवक्त्या शीतल म्हात्रे, माजी नगरसेवक समाधान सरवणकर आदी उपस्थित होते.
उबाठा काँग्रेसचरणी लीन…
दरम्यान, इंडिया आघाडीच्या बैठकीत शेवटच्या रांगेत उद्धव ठाकरेंना स्थान दिले. दुसरीकडे शिवसेना-भाजप युती असताना अमित शहा पण मातोश्रीवर येऊन गेले होते. पण आता तुम्ही उंदरासारखे कुठेही बसता. उध्दव ठाकरे दिल्लीत जाऊन वाकले नाहीत, झुकले नाहीत तर सरपटले. अशी बोचरी टीका शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी उबाठावर केली. काँग्रेसचरणी लीन झालेल्या उबाठाला माफ करा… बाळासाहेब उबाठाला माफ करा… सडका मेंदू साफ करा… अशी घोषणाबाजी यावेळी शिवसैनिकांकडून करण्यात आली.
शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेना पुढे जात आहे…
शेवटच्या रांगेत बसलेल्या उबाठाची अवस्था बाळासाहेब ठाकरे यांना आवडणार नाही, म्हणून त्यांची माफी मागायला आलो आहोत. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुढे जात असून, जनता त्यांच्या मागे आहे. जे उद्धव ठाकरे स्वतंत्र खुर्चीवर बसायचे, ते आता सोफ्यावर बसतात. अशी टिका आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी उबाठावर केली. दरम्यान, सुरुवातीला शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी अभिवादन केले. यानंतर घोषणाबाजी देत प्रतिकात्मक आंदोलन केले. उबाठाची काय गत झाली आहे… त्यांची काय अवस्था झाली हे कालच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत दिसून आल्याच्या घोषणा शिवसैनिकांनी केली.





