Eknath Shinde : शिंदेचे 35 आमदार भाजपात जाणार; सामनातून धक्कादायक दावा

Asavari Khedekar Burumbadkar

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा गट भाजपवर नाराज आहे, भाजप ज्याप्रकारे एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांना पक्षप्रवेश देते त्यावरून दोन्ही पक्षात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याच्या चर्चा मागच्या अनेक दिवसापासून सुरू आहेत. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून एक खळबळजनक दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे ३५ आमदार फुटणार असल्याचा दावा सामना अग्रलेखातून करण्यात आलं आहे.शिंदे यांनी जे पेरले तेच उगवले. भाजपाला आता एकनाथ शिंदे नकोसे झाले असून शिंदे यांना त्यांची जागा दाखवण्याचा ‘लोटस’ कार्यक्रम सुरू झाला आहे असे सामनातून म्हटले आहे.

काय म्हंटल सामना अग्रलेखात ?

महाराष्ट्रात सध्या जे ‘नाराजी’ महानाट्य सुरू आहे, ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही. उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीतील त्यांचे पक्षप्रमुख अमित शहांना भेटले आणि त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार केली, “हे लोक आमचा पक्ष फोडत आहेत. चव्हाण पैशांचा वापर करून आमचे पदाधिकारी विकत घेत आहेत. हे आम्ही सहन करणार नाही.” शिंदे (Eknath Shinde) यांच्या तक्रारीवर अमित शहा फसकन हसले. शिंदे यांनी विचारले, “साहब, आप क्यूं हस रहे हो.” यावर शहा म्हणाले, “कोण कोणाचा पक्ष फोडत आहे? मुळात तुमचा पक्ष हा आम्ही म्हणजे, भाजपने फोडाफोडी करून बनवला. तुम्ही फुटलात. आम्ही त्याला पक्ष म्हणून मान्यता दिली म्हणून तुम्ही ‘पक्ष’ वगैरे भाषा वापरत आहात. तुमचा जो काही पक्ष आहे तो भाजपची उपशाखा आहे. शिंदेजी, आप क्रोनॉलॉजी समझ लीजिए. पैसे वाटून माणसे फोडण्यात तुमचा हातखंडा आहे. चव्हाण ते करत असतील तर वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. आप मुंबई जाओ और रवींद्र चव्हाण के साथ बैठकर चाय पिओ. उगाच फालतू तक्रारी घेऊन दिल्लीकडे येऊ नका.” शहा-शिंदे यांच्यामधला हा संवाद मनोरंजक आहे. आता शिंदे म्हणतात, “त्यांची दिल्लीवारी यशस्वी झाली व आपला सन्मान राखण्याचा शब्द श्री. शहा यांनी दिला.” ही शिंदे यांची बतावणी आहे.

भाजपचा स्वभाव वापरा आणि फेका (Eknath Shinde)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने शिंदे यांची अनेक माणसे फोडली. युतीच्या राजकारणात हे शोभत नाही. भारतीय जनता पक्षाने हे असे केले तर आमचा पक्ष टिकणार नाही अशी शिंदे व त्यांच्या लोकांची चिंता आहे. रवींद्र चव्हाण हे ठाणे जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे ‘ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी’ असे म्हणायला हवे. रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी शिंदे गटास खिंडार पाडले. भारतीय जनता पक्षाचा मूळ स्वभाव ‘वापरा, फेका, नाहीतर गिळून फस्त करा,’ असाच आहे. शिंदे व त्यांच्या बरोबरचे 40 आमदार फुटले तेव्हा शिंदे हे मजबूत, महान नेते असल्याचा देखावा भाजपने तयार केला. शिंदे यांच्या हाती धनुष्यबाण व शिवसेना सोपवली. त्यामुळे आपणच शिवसेनाप्रमुख अशा तोऱ्यात शिंदे वावरले. आता भाजपने त्यांचे खरे रूप दाखवायला सुरुवात केल्यावर या सगळय़ांची दाणादाण उडाली आहे.

भाजपने एक ‘पक्ष’ निर्माण केला आणि त्याला संपवण्याची तयारी आता भाजपनेच सुरू केली आहे. शिंदे गटातले किमान 35 आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील हे स्पष्ट झाले आहे. भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ करून बाळासाहेब ठाकरे यांची मूळ शिवसेना फोडली. त्या फुटीचे सूत्रधार हेच शिंदे होते. आता दुसऱ्या ‘ऑपरेशन लोटस मध्ये शिंदे गटावरच घाव घालणे सुरू आहे. शिंदे यांचा पक्ष म्हणजे बुडबुडे आहेत. अमित शहा यांनी निवडणूक आयोग व सुप्रीम कोर्टाच्या संगनमताने शिंदे यांना शिवसेना हा पक्ष व धनुष्यबाण हे चिन्ह दिले. शिंदे यांनी शिवसेना फोडताना जी तलवार वापरली, त्याच तलवारीने आता त्यांचा घात होत आहे. अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या