MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

7 ऑगस्टला नवी दिल्लीत इंडिया आघाडीची खलबतं; राहुल गांधींची डिनर डिप्लोमसी!

Written by:Rohit Shinde
Published:
इंडिया आघाडीच्या नेत्यांची एक बैठक 7 ऑगस्ट रोजी बोलावण्यात आली आहे. या बैठकीला आघाडीतील प्रमुख चेहरे उपस्थित राहतील. बैठकीनंतर रात्रीच्या जेवणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती समोर आली आहे.
7 ऑगस्टला नवी दिल्लीत इंडिया आघाडीची खलबतं; राहुल गांधींची डिनर डिप्लोमसी!

नवी दिल्लीत आगामी काही दिवसांत इंडिया आघाडीच्या नेत्यांची एक बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ही बैठक 7 ऑगस्ट रोजी बोलावण्यात आली आहे. या बैठकीला आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित राहतील. बैठकीनंतर रात्रीच्या जेवणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी मित्रपक्षांच्या नेत्यांना या रात्रीच्या जेवणाच्या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. ही रात्रीची डिनर डिप्लोमसी राहुल गांधी यांच्या 5 सुनहरी बाग रोड येथील नवीन अधिकृत निवासस्थानी होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे.

इंडिया आघाडीच्या बैठकीत नेमकी काय रणनिती ठरणार?

भाजपविरोधात एकजुटीने उभे राहण्यासाठी स्थापन झालेल्या ‘इंडिया’ आघाडीची राजकीय हालचाल पुन्हा एकदा वेग घेत आहे. पुढील लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची मोट बांधण्यासाठी आता या आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली असून याच अनुषंगाने बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. महाराष्ट्रातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार असून इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत ते महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. उद्धव ठाकरे हे 6 ते 8 ऑगस्ट या तीन दिवसांसाठी दिल्लीत असणार आहेत.  या दौऱ्यादरम्यान ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह आघाडीतील इतर प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत. वि

सध्या सुरू असलेल्या विशेष सघन सुधारणा (एसआयआर), महाराष्ट्रातील मतदार यादीतील कथित फेरफार, ऑपरेशन सिंदूर, भारत-अमेरिका व्यापार करार आणि ट्रम्प यांच्याकडून टॅरिफ धमकी यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासून भारत आघाडीची ही दुसरी बैठक आहे. या सर्व मुद्द्यावर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे.

नवी दिल्लीत आगामी राजकारणाची दिशा ठरणार!

8 ऑगस्ट रोजी विरोधी पक्षाचे खासदार संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याची तयारी करत आहेत. या मोर्चाची अंतिम रूपरेषाही बैठकीत निश्चित केली जाईल. दुसरीकडे   उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीही विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये रणनिती आखली जाऊ शकते. काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संख्याबळ जरी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असले तरी विरोधी पक्ष आपला उमेदवार निश्चितपणे उभा करतील. ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची याआधीची बैठक 19 जुलै रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली होती. त्यावेळीच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा भेटण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या बैठकीला ममता बॅनर्जी, अखिलेश यादव आणि स्टालिन हे अनुपस्थित होते. मात्र, यावेळच्या बैठकीत अनेक प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. टीएमसीच्या सूत्रांनुसार, अभिषेक बॅनर्जी या डिनर बैठकीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे नवी दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आगामी राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरणार आहे.