सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी देखील सुरु केली आहे. मात्र राज्यामध्ये या निवडणुका होणार कधी, असा सवाल या निमित्ताने सातत्याने विचारला जात आहे. दुसरीकडे आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. नेमक्या निवडणुकीच्या अनुषंगाने काय घडामोडी घडत आहेत, ते सविस्तर जाणून घेऊ…
राज्यात 2/3 टप्प्यांत निवडणूक होण्याची शक्यता
छत्रपती संभाजी नगरमध्ये राज्य निवडणूक आयोगाची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या द्दष्टिने आढावा बैठक पार पडली. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, या बैठकीत निवडणूक आयोगाने उपलब्ध असणाऱ्या मनुष्यबळ आणि साधनसामग्रीचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे या निवडणुका एकाच टप्प्यात होणे शक्य नसल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात दोन ते तीन टप्प्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात पंचायत समिती आणि नगर परिषदेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. तर नोव्हेंबर महिन्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असल्याची सध्या माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे डिसेंबर महिन्यात राज्यातील सर्व महापालिकांची निवडणुका होणार आहे. निवडणुकीशी संबंधित कामांना चांगलाच वेग आला आहे.
निवडणुकीच्या तयारीला वेग; यंत्रणा तयारीत व्यस्त
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर वार्ड रचना, आरक्षण आणि मतदार याद्या तयार करण्याचे काम निवडणूक आयोगाकडून सुरु करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने टप्प्याटप्प्याने निवडणूका घेण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांनी देखील जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या निवडणुकांमध्ये महायुती म्हणून निवडणूका लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे तर महाविकास आघाडीमधील पक्ष देखील या निवडणूका स्वबळावर लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
महापालिका क्षेत्रांसह जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर देखील आता निवडणुकीचे वातावरण तयार होऊ लागले आहे. मतदारांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न आता इच्छुकांकडून सुरू झाला आहे. मतदारांना आश्वासने दिली जात आहे. भेटी-गाठींचे प्रमाण वाढले आहे.





