राग आणि क्रोधामुळे मानसिक, शारीरिक व सामाजिक जीवनावर नकारात्मक परिणाम होतात. जास्त राग आल्यास तणाव वाढतो, रक्तदाब वाढतो आणि निर्णयक्षमता कमी होते. अशा अवस्थेत चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात, ज्यामुळे नातेसंबंध तुटतात. सतत रागामुळे मानसिक आरोग्य बिघडते आणि आयुष्यात अस्थिरता येते. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. यासाठी श्वसनाचे व्यायाम, ध्यान, संयम आणि सकारात्मक विचार यांचा अवलंब करावा. शांतपणे संवाद साधणे, परिस्थितीचे विश्लेषण करणे आणि क्षमाशीलता अंगीकारणे यामुळे रागावर नियंत्रण मिळविता येते. रागावर विजय मिळवणे हे आयुष्यातील यशाचे गुपित आहे. याबाबत खुद्द प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले काही मार्ग जाणून घेऊ…
रागावर नियंत्रण नेमके कसे मिळवावे?
काहीजणांना छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येतो. तो त्यांचा स्वभाव असतो किंवा सवय. छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड, राग आणि चीड अनेकदा आपल्या नातेसंबंधांवर, कामावर आणि मानसिक शांतीवर परिणाम करते. अशा परिस्थितीत रागावर नियंत्रण मिळवणे काहीवेळेला कठीण जाते. पण मग राग नियंत्रणात आणण्यासाठी नेमका काय उपाय करावा हे लक्षात येत नाही.
प्रेमानंद महाराज म्हणाले की, “राग केवळ समोरच्या व्यक्तीलाच जाळत नाही तर आपल्याला आतूनही जाळतो. जर तो वेळीच नियंत्रित केला नाही तर तो हिंसाचारात रूपांतरित होऊ शकतो आणि आयुष्यभर पश्चात्ताप देऊ शकतो.” “हिंसाचार किंवा आक्रमकतेमुळे नेहमीच जीवितहानी होते. अशा अनेक घटना घडल्या आहेत जिथे एखादी व्यक्ती रागाच्या भरात एखाद्याला मारते आणि नंतर आयुष्यभर तुरुंगात सडते.” महाराजांच्या मते, रागावरचा पहिला उपाय म्हणजे तो टाळणे. ते म्हणाले, “जर समोरची व्यक्ती नकारात्मक गोष्टी बोलत असेल, तर सर्वोत्तम उपाय म्हणजे तिथून दूर जाणे. जेव्हा तुम्हाला वाटेल की परिस्थिती बिघडू शकते, तेव्हा तिथून दूर जा.
रागावर नियंत्रण; परिस्थितीवर नियंत्रण
तसंच पुढे प्रेमानंद महाराज म्हणाले, “या परिस्थितीत शांत राहण्याचा प्रयत्न करा. रागात जिंकण्याचा प्रयत्न करू नका, तर परिस्थितीपासून स्वतःला दूर ठेवून स्वतःला शांत करा. अन्यथा, राग त्याच्या पूर्ण स्वरूपात बाहेर येईल.जर आपण काहीही बोललो नाही तर राग आपल्याला आतून जाळून टाकेल, म्हणून शहाणपणाने असा नियम बनवणे चांगले की आपण रागवायचं नाही. मनात ठरवावे की आपण रागावणार नाही, हळूहळू तुम्हाला शक्ती मिळेल.”
राग शांत करण्यासाठी एक आध्यात्मिक उपाय देखील सुचवला, तो म्हणजे नामाचा जप करणे. तुम्हाला आवडणाऱ्या देवाच्या नावाचा जप करा नक्कीच फरक जाणवू लागेल. नामाचा जप केल्याने हृदयातील गोंधळ शांत होतो त्यामुळे रागही शांत होतो.” असेही प्रेमानंद महाराज म्हणतात. त्यामुळे थोडक्यात काय तर तुम्ही रागावर नियंत्रण मिळवून अवघ्या जगावर नियंत्रण मिळवू शकता. त्यामुळे रागाचे नियंत्रण करण्यासाठी तुम्ही आटोकाट प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.





