राज्यातील मान्सूनच्या जोर सध्या पूर्णपणे कमी झाला आहे. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या नव्या अंदाजानुसार मध्य भारत आणि महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं शनिवारी वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सूनची अवस्था सध्या कमजोर झाली आहे. पुढील दोन आठवडे तरी राज्यात अशीच स्थिती कायम राहणार आहे. या नव्या अंदाजामुळे शेतकरी वर्गाची चिंता मात्र चांगलीच वाढली आहे.
महाराष्ट्रात दोन आठवडे पाऊस ओढ देणार?
यावर्षी मान्सून देशासह राज्यात वेळेपूर्वीच दाखल झाला होता. सामान्यपणे मान्सून महाराष्ट्रात सात जून रोजी दाखल होतो. मात्र, मान्सून 25 मे रोजीच राज्यात दाखल झाला होता. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अल्प पाऊस झाला आहे. चांगला पाऊस झाला नसल्यामुळे बळीराजा आधीच संकटात सापडला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मान्सून ट्रफ आपल्या सामान्य स्थानापेक्षा अधिक उत्तरेकडे सरकरल्यानं मध्य भारत आणि महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे काही अभ्यासकांच्या मते राज्यात पुढील दोन आठवडे फक्त तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. मोठ्या आणि प्रभावी पावसाची प्रतीक्षा कायम राहणार आहे.
महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं, तर दुसरीकडे दक्षिण भारतात मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे. याबाबत बोलताना आयएमडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, मान्सून ट्रफ उत्तरेकडे सरकण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या ते हिमालयाच्या पायथ्याशी सक्रिय आहेत, त्यामुळे सध्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशात आणि पूर्वोत्तर राज्यात चांगला पाऊस पडत आहे. मात्र दुसरीकडे मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मान्सून ठप्प झाला आहे.
मराठवाड्यातील पिके धोक्यात; शेतकरी संकटात
रम्यान पिकांना सध्या पावसाची आवश्यकता आहे, ऐन हंगामामध्ये पावसाचा जोर ओसरल्यास याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसू शकतो. मराठवाड्यात भीषण अवस्था आहे. मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये अजूनही म्हणावा असा पाऊस झालेला नाही. आता त्यात भर म्हणजे जर दोन आठवडे पाऊस झाला नाही, तर शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पिकांना सध्या पावसाची आवश्यकता आहे, ऐन हंगामामध्ये पावसाचा जोर ओसरल्यास याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसू शकतो. मराठवाड्यात भीषण अवस्था आहे. मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये अजूनही म्हणावा असा पाऊस झालेला नाही. त्यामुळे मोठ्या आणि प्रभावी पावसाची प्रतीक्षा नेमकी संपणार कधी असा सवाल या निमित्ताने निर्माण झाला आहे.





