भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये कार्तिक महिन्याचे विशेष आणि वेगळे महत्त्व आहे. म्हणून कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा खास असते तिला कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणतात. त्रिपुरारी पौर्णिमेला ‘देव दिवाळी’ असेही म्हणतात. या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला होता, त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे नाव मिळाले. या दिवशी दीपदान करण्याचे महत्त्व आहे, कारण ते अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक मानले जाते.
त्रिपुरारी पौर्णिमेची कथा
पौराणिक कथेनुसार, त्रिपुरासुराने जो उच्छाद मांडला होता, त्याला श्रीशंकर भगवानांनी शह दिला. त्रिपुरासुराच्या जाचातून सर्व देवतांची सुटका झाली. अनेक वर्षे त्रिपुरासुराच्या जाचात असलेल्या देवतांनी कार्तिक पौर्णिमेला जणू काही मोकळा श्वास घेतला आणि स्वर्गलोकात आपले आसनस्थान ग्रहण केले. तो दिवस देवतांसाठी दिवाळीपेक्षा कमी नव्हता. त्यामुळे स्वर्गात आणि देवलोकात हा दिवस ‘देवदिवाळी’ म्हणून साजरा केला जाऊ लागला. त्यामुळे हिंदू संस्कृतीत ‘त्रिपुरारी पौर्णिमे’च्या दिवशी देवदिवाळी साजरी केली जाते. याचदिवशी श्रीविष्णूचा विवाहदेखील झाला होता, असा समज असल्यामुळे या तिथीला ‘देवदिवाळी’ असे ही म्हटले जाते.

दीपदानाचे महत्त्व
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपदान करणे महत्त्वाचे आहे कारण या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला होता आणि त्याच्या विजयाचा उत्सव म्हणून हा दिवस साजरा होतो. या दिवशी घरोघरी, मंदिरांमध्ये आणि नदीतही दीपदान केले जाते, ज्यामुळे पापांचा नाश होतो आणि पुण्य मिळते, असे मानले जाते.
त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्त्व आणि देवदिवाळीशी संबंध
कार्तिक पौर्णिमेला अनेक शुभ गोष्टी घडल्याचे मानले जाते. यामध्ये भगवान विष्णूंनी मत्स्यरूपाने घेतलेला पहिला अवतार आणि ‘हरिहर भेट’ म्हणजे विष्णू आणि शंकरांची भेट होते, असे मानले जाते. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी घरोघरी, अंगणात, मंदिरात दिवे लावण्याची पद्धत आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये दीपदान करण्याची परंपरा आहे. या दिवशी दीपदान केल्याने पुण्य मिळते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











