भाऊबीज व पाडव्याच्या नंतर दिवाळीचे मुख्य दिवस समाप्त होत असले तरी तुळशीच्या लग्नानंतरच खऱ्या अर्थाने दिवाळीची सांगता होते. तुळशी विवाह म्हणजे तुळशीचे रोप (वृंदा) आणि भगवान विष्णूचे शालिग्राम रूप (कृष्ण/विष्णू) यांचा विवाह लावण्याचा सोहळा. या दिवशी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुळशी विवाह पार पडतात, तुळशीचे लग्न लागल्यानंतर मनोभावे पूजा करून प्रसाद अर्पण केला जातो. तुळशी विवाहाच्या शुभ प्रसंगी गोड पदार्थ आणि उसाच्या रसाचा नैवेद्य म्हणून दाखवला जातो. यासोबतच, पंचामृत आणि इतर पारंपरिक मिठाई व फळे यांचाही नैवेद्य म्हणून वापर केला जातो. जर तुम्ही अर्पण प्रसादाची रेसिपी शोधत असाल तर आम्ही खास रेसिपी घेऊन आलो आहोत अननस केसरी शीरा रेसिपी चला तर मग जाणून घेऊया अननस केसरी शीरा कसा बनवायचा…
साहित्य
- रवा
- अननसाची प्युरी (किंवा किसलेले अननस)
- साखर (आवडीनुसार)
- पाणी किंवा दूध
- तूप
- केशर (थोडेसे दूध किंवा पाण्यात भिजवलेले)
- ड्राय फ्रुट्स (बदाम, मनुके)
- वेलची पूड
कृती
- कढईत तूप गरम करून त्यात रवा घालून हलका सोनेरी होईपर्यंत भाजा. नंतर रवा एका ताटात काढून बाजूला ठेवा.
- त्याच कढईत थोडे तूप घालून अननसाची प्युरी किंवा किसलेले अननस घालून चांगले परतून घ्या.
- एका भांड्यात पाणी किंवा दूध गरम करून त्यात केशर घाला.
- भाजलेल्या रव्यामध्ये अननसाचे मिश्रण, साखर आणि केशर घातलेले गरम पाणी किंवा दूध घालून चांगले ढवळा.
- मिश्रण थोडे घट्ट होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवा.
- तूप घालून आणि ड्राय फ्रुट्स घालून सर्वकाही व्यवस्थित मिक्स करा.
- गरमागरम अननस केसरी शिरा तयार आहे.












