राज्यातील थंडीबाबत आता हवामान विभागाकडून मोठी अपडेट समोर येत आहे. 15 डिसेंबरपासून महाराष्ट्रातील हवामानात बदल जाणवू लागला असून गेल्या आठवड्यातील कडाक्याच्या थंडीचा जोर आता कमी झाला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार थंड वाऱ्यांचा प्रभाव घटल्याने किमान तापमान स्थिरावले आहे. सकाळी व रात्री हलका गारवा जाणवेल, तर दुपारच्या वेळेत तापमान वाढून हवामान उबदार राहणार आहे. राज्यातील बहुतांश भागांत आजचा दिवस थंडीपेक्षा अधिक आरामदायक ठरणार आहे.
राज्यातील थंडी कमी होण्याचा अंदाज
हवामान कुठे अन् कसे राहणार ?
मुंबईसह कोकण विभागात 15 डिसेंबर रोजी मुख्यतः स्वच्छ आणि सूर्यप्रकाशित हवामान राहील. मुंबईत किमान तापमान 22 अंश सेल्सिअस आणि कमाल 33 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. आर्द्रता 60-70 टक्के राहील, पण कोरडे वारे वाहतील. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे-पालघर भागातही तापमान 20-33 अंशांच्या दरम्यान राहील. समुद्रकिनारी हलके वारे आणि चांगली दृश्यमानता अपेक्षित आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात कोरडे आणि थंड हवामान कायम राहील. पुण्यात किमान तापमान 12 अंश आणि कमाल 30 अंश सेल्सिअस राहील. सकाळी गारठा जाणवेल, दिवसभर निरभ्र आकाश राहिल. कोल्हापूर आणि सांगलीत तापमान 15-31 अंशांच्या आसपास राहील. धुके कमी होईल, पण रात्री थंडी वाढेल.
नाशिक, धुळे आणि जळगाव भागात स्वच्छ आकाश आणि थंड सकाळ अपेक्षित आहे. नाशिकमध्ये किमान तापमान 10-12 अंश आणि कमाल 28-29 अंश सेल्सिअस राहील. उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्रता कायम, पण कोरडे हवामान शेतीसाठी चांगले. धुक्याची शक्यता कमी राहील. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी भागात निरभ्र आकाश आणि कोरडे हवामान राहील. छत्रपती संभाजीनगरात तापमान 12-31 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. मराठवाड्यात सकाळी थंडी जाणवेल, दिवसभर उबदार वातवरण राहील.
नागपूरसह विदर्भात अकोला, अमरावती, वर्धा कोरडे आणि थंड हवामान कायम राहील. नागपूरमध्ये किमान तापमान 15 अंश आणि कमाल 29 अंश सेल्सिअस राहील. सकाळी धुके, पण दिवसभर निरभ्र आकाश राहील. विदर्भाच्या काही भागांत थंडीची लाट कमी होईल, तरी रात्री गारठा जाणवेल. दरम्यान, 15 डिसेंबरला महाराष्ट्रात थंडीची लाट नसली तरी गारठा कायम राहील. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती जाणवेल. कोणताही सतर्कतेचा अलर्ट नाही. तरीही नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.





