मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात ‘मुख्यमंत्री कार्यालय वॉर रूम’ बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील अनेक महत्त्वाच्या विकास कामांचा आणि प्रकल्पांचा आढावा घेतला.
हे प्रकल्प राज्याच्या विकासाला पूरक असल्यामुळे त्यांना गती देण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकारी आणि विभागांना दिल्याची माहिती आहे.
कोणकोणत्या प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
1. बीडीडी चाळ
2. ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह टनेल प्रकल्प
3. बोरिवली ते ठाणे जोड बोगदा प्रकल्प
4. उत्तन-विरार सी लिंक
5. शिवडी-वरळी ईलेव्हेटेड कॉरिडॉर
6. पुणे मेट्रो व पुणे रिंगरोड
7. दहिसर ते भाईंदर लिंक रोड
8. गोरेगाव-मागाठाणे डीपी रोड
9. गोरेगाव–मुलुंड लिंक रोड आणि उत्तर सागरी किनारा मार्ग
10. विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर
11. धारावी पुनर्विकास प्रकल्प
12. जालना-नांदेड महामार्ग
13. बांद्रा-वर्सोवा सी लिंक
14. संभाजी नगर शहर पाणी पुरवठा प्रकल्प
15. कुडूस आरे कनेक्टिव्हिटी
16. कुडुस बाभळेश्वर वीज जोडणी प्रकल्प
17. शिक्रापूर बाभळेश्वर विद्युत प्रकल्प
18. वाढवण बंदर प्रकल्प
19.मुंबईतील मेट्रो लाईन 4 (वडाळा ते कासारवडवली), मेट्रो लाईन 5 (ठाणे-भिवंडी-कल्याण), मुंबई मेट्रो 6 (स्वामी समर्थनगर-विक्रोळी), मेट्रो लाईन 2 बी (डीएन नगर ते मंडाळे), मुंबई मेट्रो 7 ए (अंधेरी-छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2), मुंबई मेट्रो लाईन 9 (दहिसर पूर्व ते मिरा भाईंदर)
कमी कालावधीत प्रकल्प पूर्ण करा-मुख्यमंत्री
आपल्याकडे तंत्रज्ञान अद्ययावत आहे, त्यामुळे कमी कालावधीत प्रकल्प पूर्ण व्हायला हवेत. असे निर्देश आणि आग्रह या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरल्याची माहिती आहे.
मुंबईसह राज्यातील सर्व मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या अडचणींचे वेळेत निराकरण करावे. मेट्रो प्रकल्पांच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्प उभारावेत. मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी कुशल यंत्रणा तयार करणे आवश्यक आहे. मेट्रो व इतर सुविधा प्रकल्पांसाठी आवश्यक निधी तातडीने वितरीत करण्याची कार्यवाही करावी. असे आदेश यावेळी देण्यात आलेत.
प्रकल्पातील अडचणी सोडवण्यासाठी वॉररुम आढावा बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी पुढील बैठकीपूर्वी पूर्ण करावी. आवश्यक बाबींसाठी मंत्रिमंडळ बैठकीत विषय मांडून त्यांची पूर्तता करावी. आढावा बैठकीनंतरही अडचणी आल्यास त्या वॉररुमला कळवाव्यात, जेणेकरून त्या तातडीने सोडवता येतील. असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.
बीडीडीतील रहिवाशांना लवकरच सदनिकांचं वाटप
यावेळी सांगण्यात आले की, वरळी येथील बीडीडी चाळीतील रहिवाशांना लवकरच सदनिकांचे वाटप करण्यात येईल. तसेच नायगाव व एन.एम. जोशी मार्ग चाळीतील रहिवाशांना ठरलेल्या वेळेत सदनिका देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. या बैठकीस संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.





