State government : बांबू लागवड ही एक उत्तम आर्थिक आणि पर्यावरण संरक्षण करून शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा फायदेशीर आणि शाश्वत स्रोत बनण्यासोबतच, पर्यावरणाच्या संवर्धनातही महत्त्वाची भूमिका बजावते. कृषी क्षेत्रातील हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बांबू लागवड उपयुक्त ठरणार आहे. बांबू लागवडीकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावे, यासाठी बांबूची सशक्त व शाश्वत बाजारपेठ तयार करण्यात येईल. यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही दिली. आंतरराष्ट्रीय बांबू दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकारच्या “महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन”, तसेच फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने बांबू परिषदेचे आयोजन करण्यात आले.
पडीक व माळरानावर बांबू लागवड फायदेशीर
दरम्यान, पडीक व माळरानावर बांबू लागवड अत्यंत फायदेशीर आहे. बांबूची लागवड आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना सक्षम करणारी आहे. बांबू लागवड पर्यावरणासाठी देखील अत्यंत महत्त्वाची आहे, बांबू मातीची धूप रोखून तापमानवाढ कमी करण्यास मदत करते. बांबू लागवड जर योग्य मार्गदर्शनातून केली तर शेतकऱ्यांना प्रति हेक्टर अधिक उत्पन्न मिळू शकते. बांबूला ऊसापेक्षा जास्त दर मिळतो आणि उत्पादन देखील चांगले असते.राष्ट्रीय बांबू लागवड अभियानातंर्गत शेतक-यांना बांबू लागवडीसाठी सात लाख रूपये मदत दिली जाते. दरम्यान, शेतकऱ्यांनी बांबू लागवडीचा विचार करणे फायदेशीर ठरणारे असून शेतकऱ्यांना लखपती बनवणारे हे पीक असल्याचे ‘मनरेगा’चे महासंचालक नंदकुमार यांनी सांगितले.

बांबू लागवडीसाठी उत्कृष्ट दर्जाची रोपे
शासनाकडून बांबू लागवडीसाठी उत्कृष्ट दर्जाची रोपे वितरण करणे यासाठी अधिकृत केंद्राची उपलब्धता करुन देण्यात यावी. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणार हा व्यवसाय आहे. काही कालावधीनंतर या पिकाची कमी मनुष्यबळात देखरेख करता येते. कोल्हापूरचे बांबू उत्पादक शेतकरी अमित पाटील यांनी १५० एकर डोंगर क्षेत्रात केलेली लागवड आणि त्यापासून मिळालेले फायदे याची माहिती सविस्तर सांगितली. बांबूचा उपयोग बांधकाम, फर्निचर, कागद निर्मिती, ऊर्जा आणि हस्तकला अशा अनेक उद्योगांमध्ये होतो. ज्यामुळे त्याची मागणी कायम असते. बांबूची मुळे जमिनीत घट्ट पकड घेतात, त्यामुळे मातीची धूप रोखली जाते. बांबूची लागवड प्रदेशनिहाय वेगवेगळी करणे गरजेचे आहे.











