Weather Update: महाराष्ट्रातील हवामानाबाबत मोठी अपडेट समोर; सर्वदूर थंडी वाढण्याचा अंदाज

Rohit Shinde

महाराष्ट्रातील हवामानाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. पुन्हा एकदा तापमानात मोठी घसरण होण्यास सुरूवात झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील थंडीचे प्रमाण कमी झाले होते. आता मात्र वातावरणात बदल जाणवत असून तापमानात घट होऊन गारठा वाढला आहे. हवामान विभागाकडून देखील थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे किमान तापमानामध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार 

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि वाऱ्याची दिशा बदलल्याने महाराष्ट्रातील बहुतांश भागात तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज 4 डिसेंबर रोजी मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात वाढ होणार आहे. तापमानात वाढ झाली तरी थंडी काही प्रमाणात कायम असणार आहे. कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव ओसरल्यानंतर पुन्हा थंडीचे प्रमाण वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे एकूणच कोकण वगळता महाराष्ट्राच्या इतर सर्वच भागांमध्ये थंडीचा प्रभाव वाढत जाणार आहे. मराठवाड्यातील तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. 4 ते 7 डिसेंबर या कालावधीत तापमान 9 ते 11 अंश सेल्सियसदरम्यान राहील. आज मराठवाड्यातील आठ पैकी कोणत्याही जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला नाही. मात्र वातावरणातील अनियमित बदलांमुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

पश्चिम-उत्तर महाराष्ट्रात देखील किमान तापमानामध्ये हळूहळू घसरण होत जाणार आहे. त्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी थंडीची लाट कायम आहे. ‘डिटवाह’ चक्रीवादळ निवळल्यानंतर राज्यात आकाश निरभ्र होऊ लागले आहे. आज 4 डिसेंबर रोजी राज्यात थंडीची लाट ओसरण्याची शक्यता असून, गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आज गुरुवारी रोजी पुणे येथील थंडीची लाट ओसरली आहे. कमाल तापमान 28.3 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11.5 अंश सेल्सिअस इतके राहील. पुणे घाटमाथा परिसरात देखील गारठा कायम राहण्याचा अंदाज आहे. राज्यातील थंडीची लाट ओसरण्याची शक्यता असली तरी, गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. काही जिल्ह्यांत गारठा कायम राहून पहाटे धुक्यासह दव तर दिवसभरच्या वातावरणात थंडी राहील. दरम्यान, पुढील काही दिवसांत हवामानात मोठे बदल जाणवतील.

नागरिकांनो, थंडीत आरोग्य जपा !

दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात तापमानाचा पारा आणखी खाली येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. कडाक्याच्या थंडीत आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. थंड तापमानामुळे सर्दी, खोकला, ताप आणि सांधेदुखी यांसारख्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे शरीर उबदार राहील अशी कपडे घालणे, गरम पाणी पिणे आणि पौष्टिक आहार घेणे महत्त्वाचे आहे.

सकाळी कोमट पाण्याने अंघोळ करणे, वाफ घेणे आणि घरात पुरेशी हवेशीर व्यवस्था ठेवणे फायदेशीर ठरते. वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि अस्थमा किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी अतिरिक्त काळजी घ्यावी. व्यायाम करताना शरीरावर थंडीचा परिणाम होऊ नये म्हणून योग्य कपडे वापरावेत. पुरेसे पाणी पिणे आणि विश्रांती घेणेही आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

थंडीत हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. कारण, तापमान घटल्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तदाब वाढतो. अशा परिस्थितीत हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढणे किंवा आधीपासून हृदयाचे विकार असलेल्या व्यक्तींनी खास काळजी घेणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्या