Shinde group – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका आणि पालिका निवडणुका या धरतीवर मोठ्या प्रमाणात आयाराम गयाराम यांना ऊत आलेलं आहे. जिकडे संधी स्वार्थासाठी राजकीय नेते पक्षांतर करताहेत. आता पालघर जिल्ह्यातील उबाठा गटातील महिला आघाडीच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदआश्रमात येऊन शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पालघर जिल्ह्याची नेहमीच शिवसेनेला साथ
दरम्यान, गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामाच्या माध्यमातून आज शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत आहेत. आज अनेक लाडक्या बहिणी आणि भाऊ पक्षात प्रवेश करत असल्याचा विशेष आनंद मला वाटत आहे. पालघर जिल्ह्याने कायमच शिवसेनेला साथ दिली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील पालघर नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा झेंडा अभिमानाने फडकेल असा विश्वास व्यक्त केला.

या प्रवेशात पालघरमधील महिला जिल्हाप्रमुख नीलम म्हात्रे, महिला तालुकाप्रमुख मनिष पिंपळे, माजी सभापती शैला कोलेकर, महिला शहर संघटक मनिषा पाटील, जमीला सय्यद, प्रीती मोरे, ललिता कोळी, जितेंद्र दळवी, भावेश धर्ममेहेर, मंगेश बात्रा, माजी सरपंच विकास पाटील, विवेक घरत, विनीत पाटील, कामिनी पाटील, जयेश कोरे या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
शिवसेनेचे काम, विचार तळागाळापर्यंत पोहचवा
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, पालघरहून इथे यायला तुमच्यातील अनेकांना मोठी अडचण आली असली तरीही मुंबईतील कोस्टल रोड आपण मीरा भाईंदर, वसई विरार आणि त्यानंतर पालघरपर्यंत वाढवणार आहोत त्यामुळे भविष्यात तुम्हाला ट्रफिकमध्ये तासनतास अडकून पडावे लागणार नाही असे सांगितले. तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे काम आणि विचार तळागाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी पूर्ण जोमाने कामाला लागावे अशा सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या. यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार आणि पालघरचे संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, राजेश शहा, माजी जिल्हा परिषद सभापती वैदेही वाढाण, उप जिल्हाप्रमुख सुशील चुरी, प्रवक्ते राहुल लोंढे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते











