राज्यातील सोयाबीन बाजारात मोठा चढ-उतार पाहायला मिळाला आहे. पिवळ्या सोयाबीनला राज्यभरात सर्वाधिक मागणी दिसून आली आहे. अनेक बाजारांमध्ये दरात तेजी होती, तर काही ठिकाणी आवक कमी राहिली. राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये 26 आणि 27 नोव्हेंबर 2025 रोजी आलेल्या सोयाबीनच्या भावांमध्ये मोठा चढ-उतार पाहायला मिळाला आहे. काही ठिकाणी सोयाबीनला 6 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला तर काही ठिकाणी मात्र दर 3000 रुपयांपर्यंत दर खाली आले.
सोयाबीनला 3 ते 6 हजारांचा दर
27 नोव्हेंबर रोजी जळगाव बाजार समितीत लोकल जातीला 4375 ते 4511 रुपये दर मिळाला तर सरासरी दर 4400 रुपये होता. नागपूर बाजारात मोठी आवक असून सुद्धा दर 3700 ते 4575 रुपयांदरम्यान राहिला. चाकूर बाजारात पिवळ्या जातीला 4251 ते 4600 रुपये असा मजबूत दर मिळाला आणि सरासरी 4475 रुपये प्रति क्विंटल दर नोंदवला गेला. तर दुसरीकडे बुधवारी (26 नोव्हेंबर) येवला बाजार समितीत दर 3800 ते 4465 रुपयांदरम्यान राहून सरासरी 4400 रुपये नोंदवले गेले. शहादा बाजारात सरासरी 4300 रुपये तर छत्रपती संभाजीनगर बाजारात आवक 155 क्विंटल असूनही सरासरी दर 3954 रुपये इतका कमी होता.

नांदेड, चंद्रपूर, पाचोरा अशा काही बाजारांमध्ये दर 3300 ते 4500 रु मिळाला. कारंजा बाजार समितीत मात्र तब्बल 11 हजार क्विंटलची मोठी आवक झाली आणि सरासरी दर 4275 रुपये राहिला. सोलापूर, श्रीरामपूर, वडवणी इथे सरासरी दर 4400 रुपयांदरम्यान स्थिर होता. विदर्भातील वाशीम आणि मंगरुळपीर येथे सोयाबीनला सर्वाधिक दर मिळाला. वाशीम बाजारात पिवळ्या सोयाबीनचा जास्तीत जास्त दर 6000 रुपये नोंदवला गेला आणि सरासरी दर 5500 रुपये राहिला. मंगरुळपीरमध्येही जास्तीत जास्त दर 5650 रुपये मिळाला, तर सरासरी दर 5500 रुपये होता.
काही बाजार समित्यांमध्ये मात्र दर घसरलेले आढळले. हिंगणघाट, वणी, भद्रावती या बाजारांमध्ये सोयाबीनचा दर 1000 ते 3500 रुपयांपर्यंत खाली आला. भद्रावती बाजारात तर किमान दर 1000 रुपये नोंदवला गेला. ज्यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत. शेतकऱ्यांची चिंता यामुळे वाढताना दिसत आहे.
सोयाबीनची प्रत घसरली; दर घटले
यंदाच्या महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन पिकावर या नैसर्गिक आपत्तीचा मोठा परिणाम झाला आहे. सततच्या पावसामुळे पिके पाण्याखाली गेली, मुळे कुजली आणि उत्पादन क्षमता घटली. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने घेतलेले सोयाबीन पीक आता नष्ट झाल्याने त्यांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम झाला आहे. बाजारात सोयाबीनच्या दरातही घट झाल्याने नुकसान भरून काढणे अशक्य बनले आहे.
प्रत चांगली न राहिल्याने बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सध्या चांगला दर मिळताना दिसत नाही. बाजारात सोयाबीनच्या दरातही घट झाल्याने नुकसान भरून काढणे अशक्य बनले आहे. सरकारकडून मदतीच्या घोषणा झाल्या असल्या तरी अनेक शेतकऱ्यांपर्यंत त्या पोहोचलेल्या नाहीत. अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतकऱ्यांची कर्जबाजारीपणाची समस्या अधिक तीव्र झाली आहे. एकूणच, यंदाची अतिवृष्टी आणि पूरस्थितीने महाराष्ट्रातील शेती क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, पीकविमा दावे आणि पुनर्वसनाची गरज आहे. अन्यथा ग्रामीण अर्थव्यवस्था आणखी ढासळण्याचा धोका निर्माण झाला आहे. एकीकडे पिवळ्या सोयाबीनला चांगला दर मिळत असला साधारण सोयाबीनच्या वाणाला 5 हजारांच्या आतील दर मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.











