State government : महाराष्ट्र शासनाने काही दिवसांपूर्वी विविध कंपन्यांसोबत कोट्यावधी रुपयांचे सामंजस्य करार केले होते. यानंतर आता बेरोजगारांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने 9 कंपन्यांशी 80,962 कोटी रूपयांचे सामंजस्य करार झाले. यातून विविध प्रकल्प उभे राहणार आहेत. या करारामुळे राज्यात 40 हजारहून अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे. मुंबईतील गोरेगाव येथे एआयआयएफए (आयफा) आयोजित स्टील महाकुंभ कार्यक्रमात या प्रकल्पाबाबत अनेक कंपन्याशी करार झाले.
कोणत्या जिल्ह्यात कोणता प्रकल्प?
दरम्यान, राज्यातील छत्रपती संभाजीनगर, सातारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, रायगड आदी जिल्ह्यांत हे प्रकल्प उभारले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगरात एनपीएसपीएल अॅडव्हान्स्ड मटेरियल (अथा ग्रुप) प्रा. लि. तर्फे ५,४४० कोटींची गुंतवणूक करून ‘क्रिटिकली अॅडव्हान्स्ड लिथियम बॅटरी मटेरियल आणि कार्बन कॉम्प्लेक्स’ उभारला जाणार आहे. यामुळे ५,००० रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. तर गडचिरोलीत सुमेध टुल्स प्रा. लि. आणि हरिओम पाइप इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या संयुक्त प्रकल्पांमुळे सुमारे ५,५०० रोजगार उपलब्ध होणार असून ५,१३५ कोटींची गुंतवणूक होणार आहे.वर्ध्यात रश्मी मेटलर्जिकल इंडस्ट्री प्रा. लि.चा २५,००० कोटींचा एकात्मिक स्टील प्रकल्प येणार असून यामुळे १२,००० रोजगार मिळणार आहेत.

रायगडमध्ये जिंदाल स्टेनलेसचा प्रकल्प
याशिवाय चंद्रपूर, सातारा व नागपूर येथेही स्पंज आयर्न, ऑटोमोटिव्ह स्टील पार्ट्स आणि आयएसपी प्रकल्प उभारले जाणार आहेत. चंद्रपूर येथे आयकॉन स्टील इंडिया प्रा.लि. 850 कोटीची स्पंज प्रकल्पामध्ये गुंतवणूक करत असून यातून 1500 रोजगार निर्माण होतील. वाई येथे फिल्ट्रम ॲटोकॉम्प प्रा.लि. हे 100 कोटी रूपयांची ऑटोमोटिव्ह स्टील पार्टमध्ये गुंतवणूक करत असून याद्वारे 1200 रोजगार निर्मिती होणार आहे. मूल येथे जी.आर.कृश्ना फेरो अलॉय प्रा.लि. हे स्पंज निर्मितीसाठी 1482 कोटी रूपयांची गुंतवणूक करत असून यातून 500 रोजगार निर्मिती होईल.
तर रायगडमध्ये जिंदाल स्टेनलेस लिमिटेडचा ४१,५८० कोटींचा स्टेनलेस स्टील प्लांट बसवला जाणार आहे, ज्यामुळे तब्बल १५,५०० रोजगार निर्माण होतील. त्याचबरोबर नागपूर येथे जयदीप स्टीलवर्क इंडिया प्रा.लि. ही कंपनी आयएसपी प्रकल्पाकरिता 1375 कोटी रूपयांची गुंतवणूक करत असून यातून 600 रोजगार निर्मिती होणार आहे.











