पुणे शहराची सुरक्षा आणखी मजबूत होणार; 5 नवी पोलीस स्टेशन्स आणि 1 हजार पोलिसांचे बळ मिळणार!

पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी हा नेहमीच चिंतेचा विषय राहिलेला आहे. अशा परिस्थितीत आता महत्वाची बातमी समोर आली आहे. शहराला 5 नवी पोलीस स्टेशन्स आणि 1000 पोलिसांचे बळ मिळणार आहे.

पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी आणि महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न अशा काही समस्यांनी गेल्या काही वर्षांत पुणे शहरात डोके वर काढले आहे. याबाबत आता राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्वपूर्ण घोषणा केला आहे. पोलिसांसमोराची आव्हाने, कायदा व सुव्यवस्थेचे नवे प्रश्न लक्षात घेऊन 60 वर्षानंतर पोलीस दलाचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनची नवी रचना, नार्कोटीक्स, फॉरोन्सिक युनिट तयार करण्यात आले आहे. यापुढेही पोलस दल आधुनिक करण्यासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल. अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

पुण्यात 5 नवी पोलीस स्थानके होणार!

तसेच पुणे शहरासाठी लोहगाव, लक्ष्मीनगर, नऱ्हे, मांजरी, येवलेवाडी अशा पाच पोलीस स्टेशनची मागणी केली असून त्यास मंजुरी देण्यात येईल. त्यासाठी लागणाऱ्या एक हजार मनुष्यबळाला मान्यता देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे आयोजित पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने शहरात उभारण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन आणि नवीन उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यासोबतच पुणे शहराला आगामी काळात 1 हजार पोलिसांचे बळ देखील मिळणार आहे.

राज्य शासनाने शहरासाठी 7 पोलीस स्टेशन मंजूर करण्याची ही राज्यात पहिलीच वेळ आहे. पुणे शहराचा विस्तार आणि औद्योगिक-शैक्षणिक महत्व लक्षात घेता शहराची सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यावर भर देण्यात येत आहे.पुणे शहरातील सीसीटीव्ही प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 10 वर्षापूर्वी करण्यात आले होते. या प्रणालीला आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज नियंत्रण कक्ष जोडला जाणे आवश्यक होते. या कक्षासह आज देशातील सर्वाधिक आधुनिक सीसीटीव्ही प्रणाली शहरासाठी सुरू करण्यात आली आहे. यामुळे वाहतुकीवर प्रभावी नियंत्रणासोबत गुन्हे आणि परिस्थितीचे विश्लेषण करण्याचे काम कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने करण्यात येईल.

पुण्यातील सुरक्षा व्यवस्थेत क्रांती

पुणे हे भविष्यातील विकसित आणि महत्वाचे शहर आहे. त्यामुळे ग्रोथ हबच्या माध्यमातून पुण्याचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचा वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी उपग्रहाचा उपयोग करून अत्याधुनिक एकात्मिक वाहतूक नियंत्रण प्रणाली उभारण्यात येणार आहे. या प्रणालीशी ट्रॅफिक सिग्नल जोडण्यात येतील. याद्वारे शहरातील वाहतुकीची गती वाढविण्यास आणि पर्यायी रस्त्यावर वाहतूक वळविण्यास होण्यास मदत होईल.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रात वाहतुकीसाठी आवश्यक पायाभूत सविधांचा विचार करून पुढील 10 वर्षासाठी आराखडा तयार करण्यात येत असून त्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. जनतेसाठीदेखील हे उपलब्ध करून देण्यात येईल. जनतेच्या सूचनांच्या आधारे अंतिम वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे आगामी काही वर्षांत पुण्यातील सुरक्षा व्यवस्थेत मोठी क्रांती घडून येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

About Author

Rohit Shinde

Other Latest News