उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनोमिलनामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुक महाविकास आघाडी एकत्र लढणार की फक्त ठाकरे बंधूंची युती होणार असे प्रश्न निर्माण झाले आहेत. काँग्रेस अशावेळी ठाकरेंसोबत जाईल का?? हा सुद्धा चर्चेचा विषय आहे. यातच आता काँग्रेसची भूमिका समोर आली आहे. मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस ठाकरे बंधूंसोबत लढवणार नाही असा दावा काँग्रेसचे नेते भाऊ जगताप यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं पुढे काय? असा सवाल कार्यकर्त्यांना पडलाय.
काय म्हणाले भाई जगताप?
भाई जगताप म्हणाले, मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे सोडाच पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही. मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना ही गोष्ट सांगितली होती. आमच्या राजकीय कामकाज समितीची जी बैठक झाली त्यामध्येही मी रमेश चेन्निथला यांच्यासमोर हीच गोष्टी सांगितली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नेत्यांच्या नसतात तर कार्यकर्त्यांच्या असतात.
काँग्रेस मुंबईत स्वबळावर लढणार
जे काँग्रेस कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन आहेत, त्यांचीही इच्छा असते, आपणही कधी ना कधी निवडणू लढवावी. त्यामुळे या निवडणुका कार्यकर्त्यांना लढू द्या. कोणी कोणासोबत लढायचे, हे स्थानिक कार्यकर्त्यांना ठरवू द्या. आम्ही मुंबईतील स्थानिक कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही मुंबईत स्वबळावर लढूयात, असे काँग्रेसच्या बैठकीत सांगितल्याचे भाई जगताप यांनी म्हटले.





